हा देश वैभवी न्यावा …!

0

राज्यात आणि देशात कोरोना नंतर पुन्हा एकदा निवडणुकांचे हंगाम सुरु झाले आहेत. राज्यसभा महाराष्ट्र विधान परिषद राष्ट्रपती पदाची निवडणुक आणि नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांचे आरक्षण  सोडत पध्दतीने काढण्यात येणार म्हटल्यावर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे प्रारुप आराखडे गट गण जवळपास निश्चित झाले आहेत. येत्या पावसाळयानंतर नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान या निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे.  लोकशाही शासन प्रणालीत लोकांनी लोकांमधून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीसाठी 5 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यामुळे सर्वांना संधी मिळते. आरक्षणामुळे समाजातील वंचित, दिन दुबळे व जाती जमातीच्या लोकांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी या निवडणुकांमुळे चालून येते.

भारतासारख्या लोकशाही शासन प्रणालीच्या देशाला निवडणुका म्हटल्या म्हणजे चहुबाजुने विचार केला की, ही बाब सहज परवडण्यासारखी नाही पण निवडणुका घेणे म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे असा याचा गर्भीत अर्थ आहे. निवडणुकांमुळे देशातील अर्थचक्राला अनायासे गती देखील मिळते अनेक राजकीय नेत्यांना पद व प्रतिष्ठा लाभते तर काहींचे पुनर्वसनही केले जाते अनेकांना नवा चेहरा प्राप्त होतो तर काहींचा पत्ता देखील कट होतो. सत्तेची खुर्ची अशाश्वत असली तरी किमान 5 वर्षे ती बिनबोभटपणे भोगता येते. राज्यसभेच्या 6 जागांसाठी विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकालही संपत आला आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. 18 जुलै रोजी म्हणजे पुढील महिन्यात या सर्वोच्च पदासाठी निवडणुक होईल व 21 जुलै रोजी दिल्लीत निकाल जाहीर होतील. महाराष्ट्राने श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना या सर्वोच्च संविधानिक पदासाठी संधी  दिली होती. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी त्यावेळी निवडणुक लढविली होती. केवळ विधानसभा, लोकसभा व राज्यसभा सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. श्री. कोविंद संयमी हुशार व लोकशाहीचे खऱ्या अर्थाने भोक्ते होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरच्या स्वायतत्तेसाठी हटविलेले 370 कलम रद्द करतांना कसरत करावी लागली त्यात मुत्सद्दीपणा व अचूक निर्णय घेण्याची क्षमता याचे दर्शन त्यांच्यात दिसून आले. या पदाला मोठी गरिमा असते व्यक्ति म्हणून श्री कोविंद जरी साध्या राहणीमानाचे होते परंतु या पदाची शान वाढविण्यात त्यांनी मोठा हातभार लावला.  देशाच्या पंतप्रधानांपेक्षाही राष्ट्रपती पद उच्च असते या पदाला उच्च ठेवतांना कसोटीही लागते, परंतु कोविंदजी यांनी हे पद सांभाळून या सर्वोच्च स्थानाला वैभव प्राप्त करुन दिले. नव्या राष्ट्रपतींनी राजभवनावर जाण्यापूर्वी देशासाठी हा देश वैभवी न्यावा हे ध्येय ठेवले पाहिजे…!

Leave A Reply

Your email address will not be published.