आता DCS मोबाईल अॅपमधून नवीन रुपात ई-पीक पाहणी

१ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रब्बी हंगाम १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होत असून, शेतकऱ्यांना पीक पाहणी करणे करिता आधी ई-पीक पाहणी मोबाईल अॅप उपलब्ध होते. परंतु आता केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १०० % पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ही सुविधा माहिती करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

यापूर्वी शेतकऱ्यांनी स्वतः पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची. त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करणे करिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी १ सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यक मार्फत पीक नोंदणी होणार आहे.

पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.

नवीन मोबाईल अॅप मध्ये काय अपेक्षित

▪ पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटर च्या आत फोटो घेणे अनिवार्य.

▪ पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक

सुधारित मोबाईल अॅप मधील नवीन सुविधा

▪ शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरु होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबधित समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल.

सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की,आपण आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरीता अडचण येणार नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.