डॉ.नवज्योत कौर सिद्धू यांची काँग्रेस सोडण्याची घोषणा

गंभीर आरोप, राजकारणात खळबळ : भाजपात जाणार?

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नी डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत अशा काँग्रेसला अलविदा म्हटल्याचे जाहीर केले, जिथे मेहनती व पात्र नेत्यांचे ऐकले जात नाही आणि निर्णय वैयक्तिक स्वार्थाच्या आधारावर घेतले जातात.

काँग्रेस सोडण्यामागचे कारण सांगताना डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांच्यावर थेट आरोप केले आहेत. राजा वडिंग यांनी काँग्रेसचे नुकसान केल्यामुळे आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने यापूर्वीच डॉ. नवजोत कौर सिद्धू यांची पदावरून हकालपट्टी केली होती.

पंजाब काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून राजा वडिंग असल्याची टीकाही डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी संधान साधून काँग्रेसला बर्बाद करत स्वत:ला जेल जाण्यापासून वाचवले आहे. त्यांनी आम आदमी पार्टीशी संगनमत करुन किरकोळ लाभासाठी पार्टीला विकले आहे. माझ्यासाठी तुमच्याकडे निलंबन पत्र तयार होते, परंतू त्या सुमारे १२ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे काय ? जे नवजोतला नुकसान पोहचवण्यासाठी मजीठिया सोबत काम करत होते? तुम्ही नवजोत सिद्धूला हरवण्यासाठी त्या सर्वांना मोठ-मोठ्या पदांवर बसवले.

मी स्वत: काँग्रेस सोडली आहे.

माझ्याकडे त्यांचा बुरखा फाडण्यासाठी योग्य पुरावे आहे. परंतू त्यात मला रस नाही, कारण मी स्वत: काँग्रेस सोडली आहे. कारण काँग्रेसमध्ये कोणी आशादायक नेतृत्व नाही. मला हरवण्यासाठी अनेक लोकांना मुद्दामहून उभे केले होते. आशुजी, चन्नीजी, भट्टलजी, डॉ. गांधीजी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात तुमची कारवाई कुठे आहे. ज्यांनी खुलेआम तुम्हाला आणि पार्टीला आव्हान दिले आहे. तुम्ही हास्यास्पद ठरले आहात आणि लोक तुमची रिल्स बनवून मजा घेत आहेत. नवजोत यांच्या प्रेम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा अपमान करणे बंद करा, तुम्ही पक्षाला जिंकवण्याच्या ऐवजी त्यास बर्बाद करण्यात बिझी आहात. तुमच्या मातृपक्षाच्या प्रती इमानदार न रहाण्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे असेही डॉ. नवजोत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.

डिसेंबरमध्ये काँग्रेसने नवज्योत कौर सिद्धू यांना पक्षातून निलंबित केले होते. नवज्योत कौर यांनी मुख्यमंत्रीपदासाठी ५०० कोटी रुपयांची बोली लागते असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर काँग्रेसने त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द केले. काँग्रेसमध्ये जो कोणी ५०० कोटी रुपयांची सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो असे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे वाद झाल्यानंतर नवज्योत कौर यांनी आपले विधान तोडूनमोडून सादर केल्याचा दावा केला होता.

भाजपात जाण्याच्या चर्चा

डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेस सोडल्यानंतर, आता त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू हे देखील पक्ष सोडणार का ? असा सवाल केला जात आहेत. मात्र, सिद्धू यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही. बराच काळ काँग्रेस पक्षाचे सदस्य असूनही त्यांनी पक्षापासून अंतर राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नवज्योत कौर यांनी आज त्यांच्या अकाऊंटवर तीन पोस्ट पोस्ट केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि त्यांच्या भेटीला विरोध करणाऱ्यांना राजकीय चोर म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.