जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅशनल स्टार्टअप डे निमित्ताने स्वावलंबी भारत अभियाना अंतर्गत खासदार स्मिता वाघ यांच्या उपस्थितीत उद्यमिता संमेलन उत्साहात संपन्न झाले. डॉ. केतकी पाटील यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाच्या निमित्ताने भावी पिढीला दिशा व नवीन व्यासपीठ मिळाले असल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले.
सन 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाची घोषणा केली, हा दिवस गेल्या दशकभरात भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधोरेखित करतो. त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्टार्टअप डेच्या निमित्ताने स्वावलंबी भारत अभियान व गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यमिता संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, खा. स्मिता वाघ यांच्यासह वक्ते योगेश उदगिरे, प्रा. डॉ.विकास गिते , प्रशांत पाटील, डॉ. युवराज परदेशी, प्रा. डॉ.विजय पाटील, प्रा.डॉ.प्रशांत वारक यांची उपस्थिती होती. मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विकास गीते यांनी स्टार्टअप डे संदर्भात माहिती देताना आता स्टार्टअप सुरू करणे सोपे झाले आहेत व त्या संदर्भात लागणारे साहित्य, बॅकग्राऊंड पैसा व इतर असेट्स याबद्दलची संपूर्ण माहिती दिली. विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्टार्टअप चे नवीन फीचर्स वर विचार करा कमी पैशातही स्टार्टअप सुरू होऊ शकते. वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.
डॉ. केतकी पाटील यांनी स्टार्टअप संदर्भात माहिती सांगताना सांगितले की स्टार्टअप म्हणजेच सुरुवात करणे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. संपूर्ण जगात आपण स्टार्टअप मध्ये तीन नंबरवर आहोत हेही त्यांनी नमूद केले. आपल्या भागात स्पर्धा कमी आहे म्हणजेच आपल्याला जास्त स्कोप आहे हे त्यांनी स्पष्ट केले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्याचप्रमाणे विविध भाषांवर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे तसेच प्राचीन इंटेलिजन्स कडेही विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच आज हे व्यासपीठ उभे करून दिल्याचे मनोगत व्यक्त केले.
खा. स्मिता वाघ यांनी राजकारणाआधी त्या स्वतः एक उद्योजक होत्या त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना विशेष आदर आहे. त्यांच्या उद्योजकता ते राजकीय प्रवास त्यांनी रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना कथन केला. नोकऱ्या करण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील यांनी कौतुक केले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. हेमंत इंगळे, प्रा.महेश पाटील, डॉ.अतुल बऱ्हाटे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नीलाक्षी बर्डे व हेमांगी बावा या विद्यार्थिनींनी केले.

