लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील १० दिवसात डिझेलच्या दरात ४ वेळा वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलच्या किंमती प्रति लिटर ७ ते ८ रूपयांनी वाढल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचा फटका एसटी महामंडळालाही बसला आहे. सातत्याने दरवाढ होत असल्याचा फटका एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही होत असल्याचे प्रताप सरनाईकांनी सांगितले. त्याशिवाय एसटीच्या तिकीट दरवाढीवर प्रताप सरनाईकांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.
सध्या एसटी बस तिकिट दरवाढीचा विचार नाही. मात्र वारंवार डिझेलचे दर वाढले तर दरवाढ केल्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट संकेत प्रताप सरनाईकांनी दिले. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी सेवा देणे हेच एसटीचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र, ऑईल कंपन्यांकडून वारंवार होणारी दरवाढ आणि पुरवठ्यातील तूट यामुळे महामंडळाच्या उत्पन्नावर थेट परिणाम होत आहे. सध्या एसटी भाडेवाढीचा कोणताही विचार नाही. मात्र, जर डिझेलचे दर असेच सातत्याने वाढत राहिले, तर भविष्यात दरवाढ केल्याशिवाय महामंडळासमोर कोणताही पर्याय उरणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आता प्रशासनाने एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. महामंडळाच्या सर्व आगारांना दररोज किमान ५ लीटर डिझेल वाचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केवळ ५ लीटर डिझेल वाचवल्यास महामंडळाची लाखो रुपयांची बचत होऊ शकते, असे प्रताप सरनाईक म्हणाले. डिझेलची बचत करण्यासाठी सर्व बसेसचा मेंटेनन्स करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जो चालक सर्वाधिक डिझेलची बचत करेल, त्याचा महामंडळातर्फे विशेष सत्कार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसटी महामंडळाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी दररोज १० लाख ८७ हजार लीटर डिझेलची आवश्यकता असते. हा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत थांबू नये आणि दररोज प्रवास करणाऱ्या राज्यातील सुमारे ५५ लाख सर्वसामान्य प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महामंडळाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. डिझेल पुरवठादार कंपन्या असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, नायरा आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसोबत एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा झाली अशी माहिती सरनाईक यांनी दिली.


