जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज खडसेंच्या मुलाबद्दल केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या मुलाने आत्महत्या केली की खून झाला, हे तपासणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली आहे. सध्या खडसे विरुद्ध महाजन अशी आरोप-प्रत्यारोपाची फैरी सुरू झाली आहे. त्यात महाजन यांनी आज थेट खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने एकच चर्चा सुरू झालीय.
महाजन म्हणाले की, ते माझ्या मुलाबाळांवर जात असतील, तर आमदार एकनाथ खडसेंना एक मुलगा होता. ३२ व्या वर्षी त्याला काय झाले? कुणामुळे झाले, हा ही संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो तर त्यांना जास्त झोंबेल. तुमच्या मुलाचे काय झाले? आत्महत्या झाली की खून झाला, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच तुमचे भले असल्याचे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची मंत्री महाजन उत्तरे देत होते.
मंत्री महाजन म्हणाले, आमदार एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत, याचे त्यांना भान नाही. बेभान झालेले आहेत. वाट्टेल तसे बोलताहेत. अनेक ठिकाणच्या चौकशा, दूध संघ, भोसरीची भानगड अशा अनेक भानगडी आहेत. सबळ पुरावे मिळत असल्याने अस्वस्थ झाले आहेत.
महाजन पुढे म्हणाले की, टांगेळ्याखालची भाषा बोलायला लागले आहेत. एका कार्यक्रमात ते गिरीश महाजनांना दुर्दैवाने मुलगा नाही, असे म्हणाले. तो आमदार झाला असता सूनही आमदार झाली असती. मला दोन मुली आहेत. त्यांना राजकारणात आणलेले नाही. मुलगा नसणे हे दुर्दैवी नाही. मुली असणे हे सुदैव आहे. आनंदी आहे. त्यांनाही एक प्रश्न आहे. त्यांनाही मुलगा होता. त्याचे काय झाले. त्याचे उत्तर द्यावे. हा विषय मला बोलायचा नाही.
पोलिस निरीक्षक अशोक सादर आत्महत्या प्रकरणात ज्यावेळी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. काही नेते आहेत. जे प्रश्नच जास्त विचारतात. त्यांचेही नाव त्यात आले होते. सादरेंच्या पत्नीने आवाज करून दोषी सांगितले होते. सादरेंनी कशामुळे आत्महत्या केली? हे सर्वांना माहिती आहे. चोराच्या उलट्या बोंबा कुणी करू नये. आपणच सर्व धंदे करायचे आणि चोर चोर करायचे हे सर्व जिल्हावासीयांना माहिती आहे. असे बोलून तुम्ही स्वत:चे पाप झाकू शकत नाही, असा आरोपही महाजन यांनी केला.
भोसरी प्रकरणात जावई सतरा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन का करत नाही. माझ्यावर मोका लावला. या प्रकरणात जो पेनड्राईव्ह आलेला आहे. तुमचे षडयंत्र समोर आले. दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल. महापुरुषांबद्दल बोलणे टाळले पाहिजेत. त्यांच्या कुटुंबीयांनीही थांबले पाहिजेत. राज्यपालांनी शिवाजी महाराजांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत. तो विषय संपला असल्याचे महाजन म्हणाले.
महाजन म्हणाले की, निवडणुका असल्या की दोन गट असतात. तुम्ही विरुध्द सारेच समजा. तुमच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना? स्वत:ला एकटे का समजतात. जिल्हा बँक, दूध संघ स्वबळावर निवडणूक आणला, असे म्हणता तर लढून दाखवा. तुम्ही किती स्वयंप्रकाशित आहात, हे निवडणुकीत दाखवून द्यावे. तुमच्यामागे ईडी लागली तर तुमचे कर्तृत्व तसे होते, असा सवालही त्यांनी केला.