लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथील सुपुत्र लेफ्टनंट वरुण महेश पाटील यांनी सलग सहा वेळा अपयशाचा सामना करूनही जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे धुळे जिल्ह्यासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाची सर्वत्र चर्चा होत आहे.
वरुण पाटील यांचे वडील महेश शामराव पाटील हे जळगाव येथील एसटी वर्कशॉपमध्ये कार्यरत आहेत, तर आई विद्या महेश पाटील या गृहिणी आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने लहानपणापासूनच ते काका सुभाष शामराव पाटील आणि काकू डॉ. वैशाली सुभाष पाटील यांच्याकडे राहिले. काका पाटबंधारे विभागात वर्ग-२ अधिकारी असून काकू शिक्षिका आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वरुण यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळाली.
त्यांनी नंदुरबार येथील पी. जी. पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर संभाजीनगर येथील एसपीआयमधून बारावीचे शिक्षण घेतले. पुढे नाशिक येथील के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.
भारतीय सैन्यात अधिकारी होण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन वरुण यांनी सातत्याने मेहनत घेतली. या प्रवासात त्यांना सलग सहा वेळा एसएसबी मुलाखतीत अपयश आले. मात्र त्यांनी खचून न जाता स्वतःतील उणिवांवर काम केले. अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासावर सातत्याने भर देत त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.
अखेर त्यांच्या जिद्दीला यश मिळाले. आयएमए देहरादून येथे परमनंट कमिशनसाठी कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळवली. वरुण यांच्या यशामागे आई-वडिलांचे संस्कार, काका-काकूंचे मार्गदर्शन तसेच भाऊ निशांत, साहिल, प्रतीक आणि बहीण अलिशा यांचा मोलाचा पाठिंबा लाभला.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सारवे गावच्या सुपुत्राने मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. वरुण पाटील यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास तरुणांसाठी दिशादर्शक ठरत असून, “अपयश हा शेवट नसून यशाची नवी सुरुवात असते,” हा संदेश त्यांच्या यशातून अधोरेखित झाला आहे.


