थरारक : खुनाचा बदला घेत युवकाची बेछूट गोळीबार करीत केली हत्या
धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्यावरील घटना
जळगाव | प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्यावर मंगळवारी (२२ एप्रिल) रात्री आठ वाजेच्या सुमारास एका ४० वर्षीय युवकावर बेछूट गोळीबार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे १५ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी, ता. धरणगाव) असे आहे. ते वाकटुकी येथे कुटुंबासह वास्तव्यास होते. सन २०१० मध्ये घडलेल्या एका खुनाच्या प्रकरणात गोपाळ मालचे यांच्यावर गुन्हा दाखल होता. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.
घटनेची माहिती अशी की, मंगळवारी रात्री वाकटुकी फाट्याजवळ गोपाळ मालचे हे आले असता, संशयित आरोपी राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) याने त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. यापैकी एक गोळी थेट डोक्यात लागल्याने गोपाळ मालचे यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सावंत याचे वडील ज्ञानेश्वर सावंत कोळी यांचा २०१० मध्ये खून झाला होता. त्या खुनाचा सूड घेण्यासाठीच हे कृत्य केल्याचे राहुल याचे म्हणणे आहे.
गोळीबारानंतर आरोपी राहुल सावंत कोळी स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे व पोलीस अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे धरणगाव परिसरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.