लोकशाही न्यूज नेटवर्क

NEET परीक्षा घोटाळ्याचे वादळ आता थेट केंद्र सरकारच्या दारापर्यंत पोहोचले आहे. गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आज अत्यंत उग्र रूप धारण केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करत हजारोंच्या संख्येने एकवटलेल्या तरुणाईने ‘जंतर-मंतर ते संसद’ असा धडक मोर्चा काढला.
आंदोलक थेट संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत.
एकीकडे संसदेच्या दारात विद्यार्थ्यांचा आक्रोश सुरू असतानाच, दुसरीकडे आज सकाळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये झालेल्या बंद दारामागील चर्चेनंतर ‘धर्मेंद्र प्रधान आपला राजीनामा देणार का?’ या चर्चेला उधाण आले आहे. आज आंदोलकांनी सुरक्षा भिंत भेदून संसदेच्या गेटपर्यंत मुसंडी मारल्यामुळे दिल्ली पोलीस आणि प्रशासनाची चांगलीच पळापळ झाली.


