मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून झाल्यावर पुढील सुनावणी १ ऑगस्टला करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही पक्षकारांनी आपापली प्राथमिक भूमिका न्यायालयासमोर मांडली. यामध्ये शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवर आम्ही समाधानी आहे. “सर्वोच्च न्यायालयासमोर दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यावर तात्काळ भाष्य करणं अयोग्य ठरेल असं नमूद करतानाच फडणवीसांनी आजच्या सुनावणीमुळे समाधानी असल्याचं म्हटलं आहे. आमच्या बाजूने योग्य निर्णय होईल”, असं ते यावेळी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात ‘जैसे थे’चे दिलेले आदेश हे फक्त अपात्रतेच्या नोटीससंदर्भात असून इतर कोणत्याही राजकीय प्रक्रियेविषयी नसल्याचं फडणवीसांनी यावेळी नमूद केलं.