बनवेगिरीविरोधात महायुती नेत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पाच लाख महिलांची नावं यादीतून कमी : ही मतदारांना लाच

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने सर्वांनाच धक्का दिला. सरसकट सर्वच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात धडाधड पैसे आले. महायुती सरकार पुन्हा सत्तेत दाखल झाले. त्यानंतर या योजनेवरून गोंधळ सुरू झाला. या योजनेत निकषाचे, नियमाची रेषा आखण्यात आली. पाच लाख महिलांची नावं यादीतून कमी करण्यात आली. त्यावरून विरोधक संतापले आहेत. या बनवेगिरीविरोधात महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विधानसभेवेळी तर निकषात न बसलेल्या पाच लाख महिलांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आली. आता अपात्र महिलांची छाननी करण्यात आली. त्यात लाभार्थ्यांची संख्या घटली. डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी महिला पात्र होत्या. तो आकडा आता 2.41 कोटींवर आला. सरकारची मोठी रक्कम वाचली.

लाडक्या बहि‍णींच्या यादीत कपात झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. हे असं होणारच होतं. ते लोकांच्या आता लक्षात आलं आहे. ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी, आनंदाचा शिधा वा इतर सुरू करण्यात आलेल्या योजना, मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरती होती, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यावेळचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेची मतं घेण्यासाठी हा बनाव केल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. या फसवणुकीविरोधात महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी जोरदार मागणी राजू शेट्टी यांनी केली. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. अजून किती बहिणी गायब होतील हे समोर येईलच असे ते म्हणाले. एकूणच लाडकी बहीण योजनेतील कारवाईवरून आता नाराजीचा सूर आवळल्या जात असल्याचे समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.