जळगाव जिल्हा बँकेची ‘दगडी बँक’ विक्रीचा निर्णय तातडीने रद्द करा

नोकरभरती IBPS सारख्या पारदर्शक एजन्सीमार्फतच करा – आमदार एकनाथराव खडसे
जळगाव,प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ऐतिहासिक ‘दगडी बँक’ इमारत विक्रीस काढण्याच्या निर्णयावर आमदार एकनाथराव खडसे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, बँकेतील २२० रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया IBPS सारख्या १००% पारदर्शक एजन्सीमार्फतच करावी, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. आमदार खडसे यांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये बँकेच्या कारभारातील गैरव्यवहार आणि ऐतिहासिक मालमत्ता विक्रीच्या चुकीच्या निर्णयांवर कठोर टीका केली आहे.
‘दगडी बँक’ विक्रीचा निर्णय चुकीचा
आमदार खडसे यांनी बँकेचे चेअरमन संजय पवार यांच्यावर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “पूर्वी मी संचालक असताना मधुकर सहकारी साखर कारखाना, जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणी, रावेर सहकारी साखर कारखाना आणि बेलगंगा सहकारी साखर कारखाना या संस्था बँकेने विक्रीस काढल्या, कारण त्यांच्यावर कर्ज होते आणि ते वसूल होत नव्हते. पण ‘दगडी बँक’ ही बँकेची स्वतःची मालमत्ता आहे. शेजारील जागेच्या दरानुसार तिची किंमत किमान ६५ कोटी रुपये आहे. या इमारतीवर कोणतेही कर्ज नाही. मग ही विक्री का? पूर्वजांनी कमावलेली ही मालमत्ता विकण्याचा अधिकार संचालक मंडळाला कोणी दिला?”
पारदर्शक भरतीची मागणी
राज्य सरकारने बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, असे खडसे यांनी नमूद केले. “मागील वेळी IBPS सारख्या एजन्सीमार्फत २५० हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती झाली, तरी एकही तक्रार आली नाही. पुढील ३०० जागांची भरतीही मेरिटनुसार आणि पारदर्शक एजन्सीमार्फतच व्हावी. शिफारशी किंवा वशिलेबाजीला थारा नसावा,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, “सचिवांकडून काही लोक २०,००० रुपये मागत असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. अशा गैरव्यवहारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.
‘दगडी बँक’ हा वारसा
“‘दगडी बँक’ ही केवळ इमारत नाही, तर बँकेची ओळख आणि वारसा आहे. पहिल्या चेअरमनपासून सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याच ठिकाणाहून कारभार चालवला. लाखो शेतकरी आणि खातेदारांच्या भावना याच्याशी जोडलेल्या आहेत. बँकेला सध्या ही मालमत्ता विकण्याची कोणतीही आर्थिक गरज नाही. जर NPA कमी करायचे असतील, तर धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवड न करता काढलेले कर्ज तातडीने वसूल करावे,” असे खडसे यांनी सुचवले.
‘दगडी बँक बचाव’ मोहिमेची चेतावणी
आमदार खडसे यांनी स्पष्ट केले की, बँकेचा कारभार सुधारण्यासाठी त्यांचे सहकार्य राहील, पण गैरव्यवहार आणि ऐतिहासिक मालमत्ता विक्रीचे चुकीचे निर्णय तात्काळ मागे घ्यावेत. “अन्यथा, शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘दगडी बँक बचाव’ ही मोहीम तीव्र स्वरूपात हाती घ्यावी लागेल,” अशी चेतावणी त्यांनी दिली. या प्रकरणाने जळगावमधील सहकार क्षेत्रात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

