लोकशाही न्यूज नेटवर्क

कल्याण आणि भिवंडीमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या पावसाने २ जणांचा बळी घेतला. मुसळधार पावसात घराबाहेर पडले असता विजेचा धक्का लागून एक महिला आणि तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे कल्याण आणि भिवंडीमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिला आपल्या मुलांसाठी खाऊ आणण्या जात असताना ही घटना घडली. तर काम करत असताना २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात बुधवारी मुसळधार पावसादरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका महिलेचा रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या वीज वाहिनीच्या शॉकने जागीच मृत्यू झाला. शशी राहुल चक्र असे मृत महिलेचे नाव असून या घटनेनंतर महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शशी चक्र या पती राहुल चक्र आणि दोन लहान मुलांसह हनुमान नगर परिसरात राहत होत्या. बुधवारी पावसादरम्यान त्या मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावर महावितरणची वीज वाहिनी उघड्यावर पडलेली होती. पावसाच्या पाण्यात करंट पसरल्याने त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा तपास टिळक नगर पोलिस करत आहेत.
तर, भिवंडीत देखील अशीच घटना घडली. चौहान कॉलनीतील २६ वर्षीय तरुणाचा विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झालाय. दीड वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं. भिवंडीतील चौहान कॉलनीतील हनुमान मंदिरासमोर राहणारा मुश्तफा रज्जब शेख याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मुश्तफा हा येथील गोपाल स्वीट हाऊससाठी लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कॅटरिंगचं काम करत होता. कार्यक्रमांसाठी लागणारी भांडी आणि साहित्य मंदिर परिसरात ठेवली जात होती. बुधवारी तोही तिथे भांडी उतरवण्यासाठी गेला होता. त्याच दरम्यान उघड्या पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर त्याला तातडीने स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. मुश्तफाच्या पश्चात पत्नी आणि फक्त दीड वर्षांची एक छोटी मुलगी आहे. या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काम असेल तरच बाहेर पडा
दरम्यान मुंबईसाठी पुढचे काही तास महत्वाचे असणार आहे. मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे आणि रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे पाण्याखाली गेला. मुंबईतील अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा १५ ते २० मिनिटं उशिराने सुरू आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे. आज काही भागात रेड अलर्टही पावसाचा जारी करण्यात आला. हवामान विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. रायगड आणि पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली.


