मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे तीन एकदिवसीय आणि पाच टी २० समान्यांच्या दोन मालिका भारतीय संघाला खेळायच्या आहेत. त्यापैकी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या १६ सदस्यीय संघातून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शामी आणि जखमी केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (६ जुलै) वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्यानुसार, स्फोटक फलंदाज शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार असले तर रविंद्र जडेजाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
गेल्यावर्षी श्रीलंका दौऱ्यावर धवनने तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. तेव्हा इतर वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यात व्यग्र होते. वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेमध्ये ईशान किशन, ऋतुराज गायकवाड किंवा शुबमन गिल यापैकी एकासोबत धवन सलामीला येताना दिसेल. तर ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसन किंवा ईशान किशन यष्टीरक्षण करताना दिसतील. रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल यांच्यासह अष्टपैलू दीपक हुडादेखील फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.