मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईत (Mumbai) येत्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या शक्यतेमुळे मुंबई महापालिका गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती कठोर निर्णयाच्या तयारीत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात मुंबईत सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. यामुळे मुंबईकरांना गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा विचार महापालिकेचा (BMC) आरोग्य विभाग करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्टेशन, बेस्ट बस, मॉल आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा पालिकेचा विचार करत आहे. मात्र, राज्य सरकारने याबाबत परवानगी दिल्यानंतरच पालिका याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पर्श्वभूमीवर 1 एप्रिलपासून सर्व 24 वॉर्डमध्ये ‘वॉर्ड वॉर रूम’ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
रुग्णांची संख्या वाढण्याचा इशारा देण्यासोबत प्रशासनाकडून त्या पार्श्वभूमीवर तयारी देखील करण्यात येत आहे. केईएम, शीव, नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांसह महत्त्वाच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये 4 हजार बेड ऑक्टिव्ह करण्यात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये 10 टक्के बेडचे ‘कोविड वॉर्ड’ तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.