लोकशाही विशेष लेख

सध्याच्या २१ व्या शतकात, संगणकीय तसेच विज्ञान – तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलच्या दुनियेने जन्म घेतला असून १०-१२ वर्षांच्या मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत ९९ टक्के नागरिकांच्या हातामध्ये आज मोबाईल आपल्याला दिसतो. मोबाईल हातामध्ये घेऊन गेम खेळणे, हेडफोन कानामध्ये अडकवून मोबाईलवर तासन् तास गाणे ऐकणे असे प्रकार नागरिक करतांना आपणांस पावलोपावली दिसत असतात. या मोबाईलच्या दुनियेमुळे नातेवाईकांना पत्र लिहून पाठविणे ही गोष्ट दुर्मिळ झालेली आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे.
अगोदरच्या कालखंडामध्ये म्हणजेच भुतकाळामध्ये आपल्याला आपल्या नातेवाइकांना काही निरोप द्यावयाचा असेल किंवा काही सांगायचे असेल तर ते पत्राद्वारे प्रत्येकजण सांगत असत. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी पत्रव्यवहार करतांना आज पत्रपेटीमध्ये टाकलेले पत्र हे ३ ते ४ दिवसांनी किंवा अजून काही जास्त दिवसांनी पोहचत असे. व इकडून नातेवाईकाला पत्र टाकल्यानंतर ते इच्छित स्थळी पोहचून तिकडून ३ ते ४ दिवसांनी पत्राचे उत्तर येत असे. यामध्ये बराच काळ वाया जात असे. परंतु आजच्या काळात मोबाईल व्दारे तात्काळ संभाषण होऊन आपल्याला तिकडील नातेवाईकाचे ताबडतोब उत्तर मिळते. यामुळे जग खूपच जवळ आलेले आहे. तसेच जगाची प्रगती देखील झालेली आपणांस दिसते.
परंतु मोबाईलमुळे एकीकडे जगाची प्रगती झालेली आपणांस दिसते तर दुसरीकडे जगाची अधोगतीही झालेली आपणांस दिसून येत आहे. ते यावरून की, दुचाकी, चारचाकी वाहन चालवत असतांना वाहन चालक आपल्या कानामध्ये हेडफोन अडकवून गाणे ऐकत वाहन चालवत असतो. यामुळे वाहन चालवत असतांना अनेक जण अपघात होऊन यमसदनी सुध्दा गेलेले आहेत. तर अशा या हेडफोन अडकवून गाणे ऐकण्याच्या प्रकारामुळे मानवाच्या शरीरातील कानापासून जवळच असणाऱ्या मेंदुला इजा होऊन दुर्धर आजार होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
तसेच दुसरी गोष्ट अशी की, वाहन चालवत असतांना वाहन चालक मोबाईल वरही बोलतो व वाहनही चालवितो. यामुळे देखील अपघात होत असतात. मोबाईलमुळे अपघात होण्याचे प्रकार जर टाळावयाचे असेल तर वाहन चालवितांना वाहन चालकाने कानामध्ये हेडफोन अडकवून गाणे ऐकु नये व त्याचप्रमाणे मोबाईलवरुन समोरच्या व्यक्तीला संपर्क देखील करु नये. तसेच समोरुन जर फोन आलाच तर रस्त्याच्या कडेला आपले वाहन थांबवुन मोबाईलवर बोलले पाहिजे. यामुळे अपघात होण्याचे टळतील व जग अजून जवळ येऊन प्रगती पथावर जाईल यामध्ये तिळमात्र शंका नाही.

चाळीसगाव, जि. जळगाव.
मो. ९८९०७०३४८५


