लोकशाही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीगंज परिसरातील पुरानिया भागात सोमवारी घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तीन मजली इमारतीला लागलेल्या आगीत १५ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर आणि वाचनालय चालवले जात होते. तसेच इमारतीच्या तळमजल्यावर पेट शॉप, तर वरच्या मजल्यावर गेमिंग झोन होता. सोमवारी अचानक इमारतीला आग लागल्यानंतर काही क्षणांतच धूर आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली. त्यामुळे इमारतीत उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचारी घाबरून गेले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आग इतक्या वेगाने पसरली की अनेकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जीव वाचवण्यासाठी काही जण बाल्कनीत आणि छतावर धावले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अनेकांना बाहेर काढले. मात्र, काही विद्यार्थ्यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून चार जणांवर उपचार सुरू आहेत.
जखमींना केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ दखल घेतली असून त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच प्रधान सचिव (गृह) आणि डीजीपी यांना घटनास्थळी पाठवून घटनेच्या कारणांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे इमारतींमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


