मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे की मराठी माणसाच्या स्वबळावर आर्थिक राजधानी टिकून आहे. तसेच आम्ही राज्यपालांशी असहमत आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. ते शनिवारी (३० जुलै) नाशिक जिल्ह्यात मालेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईत इतर राज्यातील लोकही रोजगार करतात. इतर समाजाचे लोकही व्यवसाय, व्यापार करतात. परंतु, मुंबईत जे काही सामर्थ्य आहे, महत्त्व आहे त्यामुळेच हे होतं. याचं श्रेय इतर कुणालाही घेता येणार नाही. मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेचा कुणालाही अवमान करता येणार नाही. आम्ही शिवसेना म्हणून मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यपालांचं विधान वैयक्तिक आहे. त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासात मराठी माणसाचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. यात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वांना माहिती आहे. मराठी माणसामुळे मुंबईला नावलौकिक प्राप्त झाला आहे.”