मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास मी एवढेच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी बाळासाहेबांना मान्य नव्हत्या, नेमक्या त्याच गोष्टी करत आहेत. त्यांना सावरकर नको तर औरंगजेब हवा आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताना उबाठा सेनेवर तोफ डागली आहे.
शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, आमचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे, कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने बाळासाहेबांच्या विचारांना डावलून औरंगजेबाचे विचार जवळ केले आहेत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा नेहमी विरोध केला, उद्धव ठाकरे हे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे.
डॉ. शिंदेंमुळे मानेवरचा उतरला पट्टा
आम्ही विचारधारेसह विकासासाठी काम करत आहोत. आम्ही त्यांच्यासारखे निष्क्रिय नाही. आम्ही केवळ खुर्चीवर बसून फेसबूक लाईव्ह करत नाही. घरात बसून राज्य चालवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावे लागते. मुळात लोक कोणाला मत देतील ? त्यांची कामे करणाऱ्याला की घरी बसणाऱ्याला? त्यांनी (उद्धव ठाकरे) केवळ कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात राजकीय प्रचारसभा घेत आहेत. प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्याला केवळ डॉ. एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्या मानेवरचा पट्टा मी उतरवला आहे, याचे श्रेय मला द्यायला हवे, मी स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळे केले नाही. केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी हे पाऊल उचलले” असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.