नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. हिंसक झालेल्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करून आगी लावल्या. याप्रकरणी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास 50 जणांना घराघरातून ताब्यात घेतलं आहे.

नागपूर शहरात आज तणावपूर्ण शांतता आहे. यावर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या आहेत. राड्यात 33 पोलीस आणि 5 नागरिक जखमी झालेत. कुणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जाईल पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही.. राड्यात काही ठराविक घरं आणि अस्थापनांना लक्ष करण्यात आलं आहे… असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
नागपुरात झालेल्या राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे. सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावर आंदोलन केलं. नागपूरच्या महाल भागात अनियंत्रित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यामध्ये पोलीस देखील जखमी झाले आहेत.


