तिघात चौथ्याची मुळीच गरज नाही !

देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या दोन पक्षांमध्ये जवळीक वाढत असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू असली, तरी या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणसवीस यांनी स्पष्ट केले. ‘आम्हा तिघांच्या महायुतीमध्ये चौथ्या सहकाऱ्याची गरज नसून, शेवटपर्यंत महाराष्ट्रात आमची महायुतीच राहील,’ असेही त्यांनी सांगितले. ‘मी उत्तराधिकाऱ्याच्या यादीत नाही; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे,’ असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना महायुतीबाबत भाष्य केले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करीत आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘काही कौतुकांकडे दुर्लक्ष करायचे असते. कौतुकांबाबत सतर्क राहायचे असते. अनेकदा राजकारणात फूट पाडण्यासाठी अशा प्रकारे कौतुक केले जाते. राजकारणात एक लक्षात घेतले पाहिजे, की कोणी कितीही कौतुक केले तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत.’ ठाकरे गटाकडूनन होणाऱ्या कौतुकावर अशा कौतुकापासून सावध राहणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का, असा प्रश्न फडणवीस यांना या वेळी विचारण्यात आला. त्यावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘आमच्या तीन खुर्च्यांचे स्थान मजबूत आहे. त्यामुळे चौथ्या सहकाऱ्याची आम्हाला गरज नाही. आमची महायुती मजबूत असून शेवटपर्यंत महाराष्ट्रात महायुतीच राहील.’ उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे आणि महायुतीचे दरवाजे बंद असल्याचेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना 24 तास काम केले. सत्ता स्थापन करताना काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चर्चा कराव्या लागतात.

 

ही एक जबाबदारी !

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या आम्हा तिघांना एकमेकांचा फायदा झाला, असे त्यांनी एका प्रश्नावर नमूद केले. ‘देशसेवा आणि समाजसेवा असा मंत्र मला लहानपणापासूनच संघाकडून मिळाला आहे. आम्हाला मिळालेले पद हे पद नसून, ती एक जबाबदारी आहे. मी उत्तराधिकाऱ्याच्या यादीत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विचाराचे आहेत त्या विचारांचा मी वारसदार आहे,’ असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.