
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर एकापाठोपाठ एक निर्णायाचा धडका सुरू केला आहे. थलापती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेताच २०० मीटरपर्यंत वीज बिल माफ करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दारूच्या दुकानावर त्यांनी कठोर निर्णय घेतलाय. राज्यातील शाळा, मंदिरे, रुग्णालये आणि बस स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिघात येणारी ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. विजय यांच्या या निर्णयाचे सर्वच स्तरावर कौतुक केले जात आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी फक्त महसुलाचा विचार न करता नव्या पिढीचे भविष्य आणि महिलांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून पाऊल उचलले असल्याच्या प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांचा परिसर आता मद्यमुक्त होणार असून, सर्वसामान्यांकडून या ‘मास्टरस्ट्रोक’चे स्वागत होत आहे.
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, रुग्णालये, धार्मिक स्थळे आणि बसस्थानकांजवळील दारूची दुकाने दोन आठवड्यांत बंद केली जातील. सामाजिक कल्याण आणि जनहिताला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात असलेली ७१७ दारूची किरकोळ दुकाने दोन आठवड्यांच्या आत बंद करण्याचे आदेश दिले आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या एका अधिकृत आदेशात म्हटले आहे.
तामिळनाडू राज्य विपणन महामंडळ म्हणजेच तासमॅक सध्या राज्यात ४,७६५ दारूची दुकाने चालवते. यापैकी २७६ दुकाने प्रार्थनास्थळांजवळ, १८६ शैक्षणिक संस्थांजवळ आणि २५५ बसस्थानकांजवळ आहेत. तासमॅकच्या दारू विक्रीतून राज्याच्या महसुलात मोठा वाटा मिळतो. २०२५ मध्ये एकूण महसूल ४८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. विजय यांच्या ‘व्यसनमुक्त’ तामिळनाडूच्या आश्वासनाच्या दिशेने हे पहिले मोठे पाऊल मानले जात आहे.

