चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या अनेर नदीच्या काठावर वसलेले मोरचिडा हे शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले छोटेसे गांव. चोपडा शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जिल्हा परिषदची मराठी मुलांमुलींची सुंदर अशी शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून या शाळेत जवळजवळ ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील मुख्याध्यापक प्रमोद पाटील, गोरख पाटील आणि रविंद्र पाटील असे तीन शिक्षक कार्यरत असून त्यापैकी गोरख पाटील यांना मराठी सोबत आदिवासी भाषा येत असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी काही वेळा आदिवासी भाषेत बोलून गणित विषय आणि इतर विषय सोप्या साध्या आदिवासी भाषेचा वापर करुन शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे काम करतात.
या शाळेत खाजगी शाळेला लाजवेल अशी संगणक कक्ष लॅब ही येथील शिक्षकांनी स्वतः च्या देणगीतून बनवून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण येथे मिळत आहे. येथील विद्यार्थ्यांचे ड्रेस, गळ्यात टाय, तोंडाला मास्क अशा छान पोशाखात चिमुकले शाळेत येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा चेहरा आनंदी हसतमुख वाटत असतो.
परंतु कोरोना काळात सर्व अर्थ व्यवस्था ढासळल्याने राज्य सरकारने मध्यांतर भोजन म्हणजे शालेय पोषण आहार बंद केल्यामुळे पाहिजे तशी ओढ विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. याला जबाबदार पालक सुध्दा आहेत. जरी मध्यांतर भोजन किंवा शालेय पोषण आहार बंद केला म्हणून आदिवासी भागातील मुले शाळेत येण्यास थोड़े तरी नाकारतात असेही चित्र पाहावयास मिळते.
अगोदरच अडीच ते तीन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तरीही शिक्षक लोक मुलांना घडविण्याचे काम करीत आहेत.
या शाळेत त्यांना संगणकीय ज्ञानाचा अभ्यास देखील शिकवला जातो. हे सर्व करत असतांना लासूर येथील केंद्र प्रमुख उत्तमराव चव्हाण हे देखील प्रामाणिकपणे लक्ष देवून विद्यार्थ्यांच्या समस्या किंवा शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेत असल्याने याबाबत शिक्षकही समाधान व्यक्त करीत आहे. विस्तार अधिकारी वंदना बाविस्कर यादेखील आदिवासी भागात जावून शाळेला भेटी देवून समस्या जाणून घेतात.