चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
वरुणराजाच्या आगमनापूर्वीच शहरातील नाला व गटार साफ, सफाई कामांचा जोरदार धडाका मुख्याधिकारी हेमंत आबासाहेब निकम यांच्या निगराणी खाली झपाट्याने सुरू आहे. ‘चोपडा शहर, सुंदर शहर’ एव्हढ्या पूरते मर्यादित न राहता शहरातील जनतेच्या आरोग्याची सुरक्षितता अधिक मोलाची असल्याचा व्यापक दृष्टिकोन ठेवत या मौसमात ओढणाऱ्या साऱ्याच संकटांचा सामना कंबर खोसून करावा लागतो.
त्याआधीच हातातील उपाय वेळे आधी केल्यास अर्ध्या समस्या आधीच संपतात हा गहन विचार उराशी बाळगणाऱ्या मुख्याधिकारींनी आरोग्य विभाग दिमतीला लावून शहरातील पाणी तुंबणारे भाग, नाले, गटारी चकाचक करण्याची मोहीम जोरात सुरू केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते समतानगर भागातील स्वच्छतेनंतर मुख्य बाजारपेठ भाग, अरुण नगर ते सुंदर गढी या परिसरातील स्वच्छता पूर्ण केली आहे.
इतकेच नव्हे रस्त्यावर अडसर असलेल्या झाडे झुडपांची काटछाट होऊन पाणी प्रवाह मोकळा करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत शहराचा बहूतांश भाग चकाचक केला जाईल, त्यामुळे यंदा अति पावसाने होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार असून आरोग्याच्या दृष्टीने हवे ते उपाय ताबडतोब केले जातील. पावसाळा हा काही कोणाच्या हाताचे बाहूले नसून अनेक संकटे अनेक साथींना सामोरे जावे लागते. त्यांचे निराकरण करण्यासाठी आमचे आरोग्य विभागाची टीम सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी आबासाहेब निकम यांनी दै. लोकशाही ~ लोकलाईव्हशी बोलतांना दिली.