मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत.
भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे बहुसंख्य आमदारांना घेऊन ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणीची वेळ आणली आहे.
यामुळे दोन दिवस सलग ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. आज उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयात आले होते.
यावेळी त्यांनी ज्या खात्यांचे विषय राहिलेले आहेत, ते पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असे आश्वासन दिले. याचबरोबर मला माझ्याच लोकांनी दगा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला किंवा दुखावले असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.