चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भद्रावती शहरातील मुख्य जामा मस्जिद चौकपासुन बंगाली कॅम्प रोडने फुकट नगरकडुन केसुर्लीकडे दररोज १५ ते २० हायवा गाडयाद्वारे ॲश मातीची वाहतुक केली जाते. हायवा ही मोठ्या वाहतुक रस्त्यावरील गाडी आहे आणि रस्ता अत्यंत अरुंद असल्याने सदर रस्त्याने छोटी वाहतुक करण्यास अडचण होत असते. त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हायवाद्वारे वाहतुक केल्या जात आहे.
मात्र प्रशासनाचे पुर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे. ओव्हरलोड हायवा गाडी वाहतुकीमुळे रस्त्यांची दैनावस्ता झालेली आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले असून अरुंद रस्त्यावरून मोठी वाहतुक होत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असते. त्यातच हायवा चालक अत्यंत वेगाने वाहतुक करतात. वेळेत सदर वाहतुकीवर आळा घातला नाही तर, मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ॲश मातीच्या वाहतुकीमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून अनेकांना धुळीमुळे आजार होत आहेत,असे विश्वहिंदु परिषद व बजरंग दल यांनी नगर परिषद व पोलीस स्टेशन भद्रावती येथील दिलेल्या निवेदनातून म्हटले आहेत.
सदर परीसरातील वाहतुक तात्काळ थांबविण्यात यावी व त्यांना मुख्य चौकातील रस्त्यावरील न जाता अन्य मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात यावा किंवा पुर्णतः वाहतुक बंद करावी, अन्यथा जनहितार्थ, सर्वसामान्यांची जीवीत हानी होवु नये या करिता सदर समस्येचे निराकरण करण्याकरिता विश्वहिंदु परिषद, बजरंग दल तर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असेही दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. यावेळी बजरंग दल संयोजक सुरज पेंदाम, विशाल दाते, करण बुलानी, बंटी मंडल, कुणाल टापरे आदी उपस्थित होते.