नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. रांची येथे शुक्रवार 30 ऑगस्ट रोजी त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत भेटीचा फोटो पोस्ट करत या संदर्भात घोषणा केली. “देशातील प्रतिष्ठित आदिवासी नेते” अशा शब्दात गौरव करत चंपाई सोरेन यांचे सरमा यांनी पक्षात स्वागत केले. त्यांच्यासह झामुमोचे आणखी काही बडे नेतेही भाजपचा झेंडा हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाचा राजीनामा देताना चंपाई सोरेन यांनी तीन पर्याय सांगितले होते. मी राजकीय संन्यास घेत नाही. मी कदाचित नवीन पक्ष स्थापन करेन. या वाटेत नवा साथी मिळाला, तर त्याला सोबत घेईन, असे ते म्हणाले होते. त्यानुसार, चंपाई सोरेन बंडखोरीनंतर स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा अंदाज आधी वर्तवला जात होता. आगामी विधानसभा निवडणुका लढवताना ते भाजपसह युती करण्याचे तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु या शक्यता नंतर मावळल्या.
भाजपने गळाला का लावले?
कोल्हन टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले चंपाई सोरेन हे शिबू सोरेन यांच्यानंतर जेएमएममधील सर्वात ज्येष्ठ आदिवासी नेते होत. जेव्हा हेमंत सोरेन यांनी ईडीच्या अटकेमुळे झारखंडच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे कॅबिनेट सहकारी जोबा माझी यांच्या जागी चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले. यातून त्यांचे राजकीय वजन लक्षात येते. रांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हेमंत सोरेन 4 जुलै रोजी मुख्यमंत्री कार्यालयात परतले. झारखंडच्या मंत्रिमंडळात चंपाई सोरेन यांचा नवीन शिक्षणमंत्री म्हणून समावेश करण्यात आला होता, पण त्यांना हे रुचले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘एक्स’वर एक दीर्घ पोस्ट लिहून पक्ष सोडण्याची घोषणा केली. शिबू सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंडच्या कामगार वर्गासाठी चंपाई सोरेन यांनी मोठा लढा उभारला. 10 हजारांहून अधिक युवकांना टाटा समूहासारख्या प्रतिष्ठित कंपनीत त्यांनी नोकरीला लावले. आदिवासीबहुल भागात चंपाई यांच्या प्रभावामुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळवता आला; यासाठीच भाजपला ते महत्त्वाचे आहेत.