चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मांदूरणे शिवारात नितीन नाना नामेकर (वय २३) आपल्या शेतात पाणी भरण्यासाठी शुक्रवार १७ जून रोजी सकाळी शेतात गेला होता. त्यावेळी शेतातील विजेच्या खंब्यात विज उतरलेली होती. याचा नितीनला स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान नितीनच्या शेतातून आबा माळी हे दुध काढण्यासाठी जात असतांना नितीन निपचित पडलेला दिसून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. नितीनच्या पश्चात आई, वडील, बहिण आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.