बुके नव्हे बुक द्या !

0

मन की बात

एखाद्या व्यक्तिला वाढदिवस, नोकरीमधील बढती, पदावरील वर्णी लागली तर आपल्याकडे फुलांचा गुच्छ (बुके) देण्याची साधारण पद्धत झालेली आहे. हा बुके आता सहज उपलब्ध होत असल्याने कुणीही कुठलेही औचित्य साधून बिनधास्त बुके देवून फोटोसेशन करण्यावर भर देवू लागला आहे. मात्र या बुकेचा थोड्याच वेळात कचराकुंडीकडे प्रवास सुरु होतो आणि स्नेहीजनांनी दिलेला हा सन्मान क्षणात नष्ट होत असतो. शासकीय कार्यालयात तर प्रत्येक टेबलवर या ना त्या कारणांना आलेल्या बुकेंचे प्रदर्शन होत असते. असेच प्रदर्शन जळगाव जिल्हा परिषदेमध्ये देखील नित्याचे झालेले आहे. नव्यानेच रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या दृष्टीने हे ‘प्रदर्शन’ हेरले आणि त्यांनी यावर एक चांगला आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा उपाय शोधला आहे. श्रीमती करनवाल या कर्तव्यदक्ष म्हणून परिचित असून प्रत्येक लहान-सहान बाबींकडे त्यांचे जातीने लक्ष असते. बुकेंचा हा बाजार जिल्हा परिषदेमध्ये मांडला जात असल्याने त्यांनी ‘बुके ऐवजी बुक’ द्यावे असा फतवाच काढला आहे. प्रत्येक विभाग प्रमुखांना त्या संदर्भात आदेश देण्यात आले असून कुणीही बुके न घेता बुक घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यातून पर्यावरणाचा समतोल व वाचनाची गोळी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या हाती मोबाईल आल्याने जग अगदी जवळ आले आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत बहुतांश लोकांच्या वाचनाला ‘ब्रेक’ दिल्याचे दिसून येत. वाचनात शक्ती असून ‘वाचाल तर वाचाल’ हे यासाठीच म्हटले आहे. जगभरात अनेक उत्कृष्ट पुस्तके लिहिली गेली आहेत, ज्याच्या वाचनाने ज्ञान तर वाढतेच, चांगली माहिती मिळतेच पण नवीन शब्दांचा साठाही वाढतो. चांगली पुस्तके वाचून तुम्ही यशस्वी होवू शकतात. पुस्तके वाचून तुम्ही तुमचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही राखू शकता. पुस्तके वाचल्याने मन मजबूत होते. जर तुम्ही दररोज एखादे पुस्तक वाचले तर ते तुमच्या मेंदूची शक्ती मजबूत होण्यास मदत होते. वाचनातून शब्दसंग्रह, स्वाभिमान वाढतो. मुलांचे संवाद कौशल्य सुधारते. पुस्तके वय-संबंधित संज्ञानात्मक घट रोखण्यास मदत करतात.

एका संशोधनानुसार, जर तुम्ही पुस्तके वाचली तर म्हातारपणात अल्झायमरचा आजार होण्याचा धोकाही कमी होतो. जर प्रौढांनी दररोज गणिताचे प्रश्न वाचले आणि सोडवले तर त्यांचे संज्ञानात्मक कार्य चांगले राहते. तुम्ही दररोज पुस्तक वाचून झोपले तर तुमची तणावाची पातळीही कमी होण्यास मदत होत असते. मानसिक आराम वाटतो. एका संशोधनात असे म्हटले आहे की 30 मिनिटे एखादे पुस्तक वाचल्याने रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि मानसिक त्रासाची भावना योग आणि विनोदाप्रमाणे प्रभावीपणे कमी होऊ शकते. पुस्तके वाचल्याने रात्री चांगली झोप लागते. ऐवढे सारे फायदे असतांनाही आपण वाचनाकडे दुर्लक्ष करीत आहोत हे धोक्याचे आहे. आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी बुके देण्यापेक्षा बुक देणे कधीही चांगले हाच मुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी पुढे आणला असून त्यांनी या संदर्भात पुढाकारही घेतला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

दीपक कुळकर्णी
मो. ९९६०२१०३११

Leave A Reply

Your email address will not be published.