बदलत्या जीवनशैलीनुसार पाठ आणि मणक्यांची काळजी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

आपल्या देशाचा कणा म्हणजे आपल्या देशाची युवा पिढी आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. देशाच्या अर्थचक्रातील बदलामध्ये याच युवकांचे मोलाचे योगदान असते. परंतु जस जसा काळ बदलतो आहे तस तशी जीवनशैली देखील झपाट्याने बदलतांना दिसतेय. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी. फास्टफूड आणि जंकफूडचा चस्का, कामाचा प्रचंड व्याप, कार्यालयात किंवा घरामध्ये संगणकासमोर तासनतास काम करताना खुर्चीवर बसण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे आलेलं नैराश्य अशा अनेक कारणांमुळे आजच्या युवापिढीला अकाली पाठ दुखीचे आणि मणक्यांचे विकार जोडताना दिसतात.

त्याकडे दुर्लक्ष केलं तर हेच विकार गंभीर आजारात बदलू शकतात आणि एका अर्थाने शारीरिक अपंगत्वच येऊ शकत. यासाठीच आपली बदलती धावती जीवनशैली आणि पाठीची व मणक्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी. यासंदर्भात पुण्याच्या संचेती हॉस्पिटलचे संचालक पदमविभूषण डॉ. के. एच. संचेती यांच्याशी केलेली बातचीत..

१] बदलती जीवनशैली आणि मणक्यांचे होणारे विविध आजार याच्या पाश्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने स्वास्थ किंवा फिटनेसची जी व्याख्या केलेली आहे ती नेमकी काय आहे ?
– सुदृढ स्वास्थाची जागतिक आरोग्य संघटनेने केलेली व्याख्या म्हणजे विकार मुक्त शरीर, काम करण्याची तत्परता, आनंदमयी विरंगुळा आणि आणीबाणीची परिस्थिती उद्भवलीच तर तितक्याच तत्परतेनं तोंड देण्याची असलेली तयारी म्हणजेच सुदृढ स्वास्थ होय. या चारही गुंणानी संपन्न शरीर म्हणजेच फिटेनेस म्हणता येईल.

२] सुदृढ स्वास्थ्याची व्याख्या आपण सांगितली परंतु या स्वास्थ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात ?
– स्वास्थ्य म्हणजे फिजिकल अर्थात शारीरिक स्वास्थ्य, मेंटल म्हणजेच मानसिक स्वास्थ्य आणि सोशल म्हणजेच सामाजिक स्वास्थ्य अशा तीन गोष्टी यामध्ये अंतर्भूत होतात. यामध्येही उपप्रकार असे की, शारीरिक स्वास्थ्यामध्ये हृदयाचे स्वास्थ्य, सांधे आणि स्नायूंचे स्वास्थ्य आणि मणका आणि कान यांचे स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्यामध्ये देखील ३ प्रकार पडतात. भावनिक, स्पिरिच्युअल आणि भावना व्यक्त करतो ते स्वास्थ्य. आणि शेवटचे म्हणजे सोशल अर्थात सामाजिक स्वास्थ्य. आपल्या घरातील आपल्या कुटुंबियांशी आसपासच्या शेजाऱ्यांशी, परिसरातील लोकांशी असलेले चांगले वर्तन म्हणजे सामाजिक स्वास्थ्य म्हणता येईल.

३] आपले शरीर स्वास्थ्य सुदृढ राखायचे असेल तर त्यासाठीची परिमाण कोणती आहेत ?
– आपल्या हृदयाचे ठोके २० ते ३० टक्क्यांनी वाढतील अशा प्रकारचे व्यायाम हृदयाच्या स्वास्थ्यासाठी करणं गरजेचं आहे. त्याच प्रमाणे आपल्या हाताच्या आणि पायाच्या सुयोग्य हालचाली होणं गरजेचं आहे त्यासाठी स्नायूंचे व्यायाम देखील तितकेच महत्वाचे असतात. स्नायूंच्या व्यायामाचे ४ प्रकार आहेत १] ताकद २] स्टॅमिना ३] लवचिकता ४] सांध्यांची हालचाल या चार गोष्टीमुळे आपल्याला शारीरिक क्षमता वाढवता येते. आपण जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा पाठीचा कणा सरळ राहील अशा अवस्थेत ताठ बसणं कधीही हितावह असत. पाठीचा कणा ताठ ठेवल्याने आपली एकूण शारीरिक क्षमता आणि प्रतिमा देखील स्वस्थ दिसते.

४] आपले मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी ?
– मानसिक स्वास्थ्य म्हणजेच मनाचे स्वास्थ्य. याकडे एकूण ४ भाग आहेत. आनंदीमय जगणं, आपण जे काम करतो त्या कामामध्ये रमणे, आपला चेहरा सदैव हसतमुख ठेवणं आणि संवेदनशीलता या चार गोष्टी जर उत्तम राखल्या तर आपलं मानसिक स्वास्थ्य देखी उत्तम राहते.

५] बदलत्या धावत्या जीवनशैलीचे विशेषतः २० ते ६० या वयोगटातील लोकांच्या आरोग्यावर अनेक परिणाम जाणवतात. विशेषतः त्यांना मणक्याचे आजार उदभवतात त्यांनी कोणती काळजी घ्यावी ?
– आपण आपल्या मानवी जीवनशैलीचा बारकाईने विचार केला तर असं लक्षात येत की साधारणपणे मूल जन्माला आल्यापासून ते २० वर्षापर्यंतच्या काळात त्याच्या शरीराची वाढ होत असते. वयाचा २० ते ४० हा टप्पा म्हणजे गोल्डन पिरिअड असतो. या वयात नवीन काहीतरी करण्याची घडविण्याची उर्मी असते. मात्र ४० ते ६० या वयामध्येच नेमकी शरीराची विशेष काळजी घेणं महत्वाचं असत. या वयात शारीरिक व्यायाम करणं जमेल तसं वजन उचलणं, त्यासाठी डंबेल्स, सॅन्डबॅग्स, थेरा बंद या उपकरणाचा व्यायामासाठी उपयोग करण गरजेचं आहे. या वयात गुडघ्यांना त्रास जाणवतो, स्नायू आखूड होतात त्यासाठीच योग नियमित करणे गरजेचे असते. त्याशिवाय चालण्याचे, धावण्याचे व्यायाम देखील महत्वाचे ठरतात.

६] मानसिक स्वाथ्य उत्तम राखण्यासाठी योगाचे महत्व फार आहे ते नेमके कसे ?
– खरं तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी योगाचे महत्व खूप आहे. विशेषतः मणक्याचे आजर जर टाळायचे असतील तर धनुरासन, वक्रासन, पवनमुक्तासन, नौकायन, ताडासन अशा प्रकारचे आसनामुळे मणक्यांच्या पुढच्या आणि मागच्या स्नायूंना ताण येतो आणि मणके चांगले राहतात. त्यासाठीच प्रत्येकाने किमान १५ मिनिट तरी अशा प्रकारचे योगासन करायला हवी. काम करताना कम्प्युटरवर काम करताना खुर्चीवर नेहमी सरळ आणि ताठ बसावे. शिवाय चालताना देखील सरळ चालावे बाक काढून चालू नये. यामुळे पाठदुखीचे आजार टाळता येतात.

७] अनेकांना नेहमी पाठदुखीचा आजार असतो अशा लोकांसाठी बेड कसा असावा ? आणि उशी घेऊन झोपताना काय काळजी घ्यावी ?
– पाठदुखीचा त्रास हा स्पाईनमध्ये बिघाड झाल्याने उदभवतो. अशा लोकांनी झोपताना कडक गादीवर झोपावं किंवा झोपताना खाली दोन तीन ब्लॅंकेट अंथरून मगच झोपावं. शिवाय सरळ झोपावं. उत्तानं झोपताना डोक्याखाली उशी घेऊ नये . मात्र डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर आणि पाठीवर झोपताना मात्र डोक्याखाली उशी घेऊन झोपावं ज्यामुळे मणक्यावर ताण येत नाही.

८] पाठीची आणि मणक्यांची काळजी घेताना विविध प्रकारच्या व्यायामाबरोबरच योग्य आहाराची देखील तितकीच गरज असते त्याबद्दल काय सांगाल ?
– आपल्याला लहानपणापासून शिकवलेले असते की भूक लागल्यावर दर ३ ते ४ तासांनी काहीतरी खावे. ज्यामुळे आपल्या शरीराची कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम अशा विविध घटकांची गरज भागते. मात्र आता बदलत्या जीवनशैली प्रमाणे अनेक आहारतज्ज्ञ कीटोज डाएट सुचवतात. यामध्ये कर्बोदकाऐवजी फॅट्स जास्त वाढवले जातात त्यासाठी उपवास करण्यास देखील सांगतात. यामध्ये शरीरातील जास्त फॅट्स नंतर काढले जातात आणि वजन कमी करता येत. शिवाय वॅगन डाएटमध्ये दूध, दही, लस्सी, ताक असे दुग्धजन्य पदार्थ न खाण्याचे सुचविले जाते. त्याऐवजी २५ टक्के पालेभाज्या, २५ टक्के कडधान्य आणि २५ टक्के सलाड खायला सांगितलं जातं. परंतु या सर्व थिअरी प्रत्येक व्यक्तिगणिक योग्य की अयोग्य हे सांगता येणार नाही. खरं तर आपल्या रोजच्या दिनचर्येत रोजचा सकाळचा नाश्ता हा साधा, दुपारचं जेवण हे लाईट आणि रात्रीचे जेवण अगदी हलके असावे. यामुळेच अशा साध्य आहारमुळेच आपले मानसिक आरोग्य स्वास्थ्य राखता येत.

९] सततची पाठदुखी आणि कंबरदुखी याचे शरीरावर दुष्परिणाम होतात का ?
– सततच्या पाठदुखीमुळे खूप वेदना होतात, शिवाय काहीही करावंसं वाटत नाही खूप नैराश्य येत आणि अगदी मनुष्य डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकतो. त्यासाठीच पाठदुखीचा किंवा कंबरदुखीचा आजारामागचे मूळ शोधून त्यावर औषधोपचार करणं गरजेचं आहे. काही आजार हे व्यायामामुळे देखील बरे होतात. मात्र काही आजारात सर्जरी करून देखील ते आजार बरे होतात.

१०] बदलत्या जीवनशैलीमुळे हाडांचे विविध विकार उदभवतात ?
– धावत्या जीवनशैलीमुळे पाठीच्या मणक्यांमध्ये ज्या दोन चकत्या असतात त्यावर ताण पडतो आणि त्यामुळे मग पाठदुखीचा विकार बळावतो. तसेच मेकॅनिकल बॅकेकमध्ये आपल्या स्नायूंची एक ठराविक स्थिती असते त्यामध्ये जर बदल झाला तर किंवा ही स्थिती काही कारणामुळे बददली तर पाठदुखीचा त्रास सुरु होतो. चकती सरकली की मज्जातंतूवरील नसेवर दाब पडतो आणि प्रचंड वेदना सुरु होतात. यासाठीच शरीराची हालचाल आणि आपले विचार
याचा समन्वय सुव्यस्थित असणे गरजेचे असते. काम करताना ते लक्षपूर्वक आणि सुयोग्य पद्धतीने बसून करणं कधीही चांगलं.

११] डिफिशिएन्शी हा कसला विकार आहे ?
– ज्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असते त्यांना हा विकार असतो. आपल्याकडे विशेषतः स्त्रियांमध्ये व्हिटॅमिन डी ची खूपच कमतरता असलेली दिसते. यामुळे मणक्यांमध्ये गॅप पडतो. त्यामुळे चक्कर येणे, गुढघ्याचे स्नायू दुखणे असा त्रास होतो. परंतु व्हिटॅमिन डी ची कमतरता औषध आणि नियमित व्यायामामुळे भरून काढता येते.

१२] ज्यांना मणक्याचा आणि कंबरेचा त्रास असतो आणि अशा लोकांना खूप लांबचा प्रवास करायचा असेल तर अशा लोकांसाठी काही विशिष्ट प्रकारचे बेल्ट देखील उपलब्ध आहेत का ?
– हो. ज्यांना मणक्यांचा त्रास असेल अशा लोकांनी गाडी चालवताना ट्रायसिंग बेल्ट बांधूनच प्रवास करावा. त्यामुळे आपली बसण्याची स्थिती ही एक सारखी आणि सरळ होते. शिवाय प्लास्टिक कॉलर मिळते ती लावून प्रवास केला कि मणक्यांची पोजिशन सरळ ठेवता येते. तसेच मणक्याचे आजार ज्यांना असतील त्यांनी मानेचे एस व्यायाम करावा. म्हणजे मन पुढे आणि पाठीमागे ओढण्याचा सतत व्यायाम करावा. थोडक्यात मणक्याचे आजार जर टाळायचे असतील
तर रोज एक तास तरी योगासन आणि मानेचे व्यायाम करावेत.

संकलन –संयोजन
सुबोध रणशेवरे
संपर्क -९८३३१४६३५६

Leave A Reply

Your email address will not be published.