अहमदाबाद विमान अपघातातील ‘इतक्या’ मृतदेहांची ओळख पटली
माजी मुख्यमंत्र्यांचाही DNA जुळला : मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
लोकशाही न्यूज नेटवर्क
अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत असून, मृतांचा आकडा आता २७५ वर पोहोचला आहे. अपघातग्रस्त विमानात एकूण २४१ प्रवासी होते, तर ३४ जण बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील विद्यार्थी होते. १२ जूनला दुपारी दीडच्या सुमारास अपघात घडला. काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या प्रकरणी आता मृतदेहांची ओळख डीएनए टेस्टद्वारे केली जात आहे. आतापर्यंत ३१ मृतदेहांच्या डीएनए नमुन्यांचे जुळवाजुळव झाले आहेत. दरम्यान, १२ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद सिव्हिल रूग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३१ मृतदेहांचे डीएनए चाचणी पूर्ण झाली आहे. ३१ मृतदेहांच्या डीएनए नमुन्यांचे जुळवाजुळव झाले आहे. १२ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केले आहे. आम्ही उर्वरित मृतदेहांचे नातेवाईक येण्याच्या प्रतिक्षेत आहोत. उरलेले मृतदेह लवकरच त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याही मृतदेहाची ओळख डीएनए चाचणीवरून झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या डॉक्टरांकडून प्रत्येक मृतदेहाच्या डीएनए चाचणीचं काम सुरू असून, लवकरात लवकर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. अनेक कुटुंब या अपघातात उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांचे आधारवड हरपल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरकारी यंत्रणा,आरोग्य कर्मचारी तसेच तपास संस्थांकडून मृतदेह ओळख पटवण्याचा काम युद्धपातळीवर करीत आहेत. ओळख पटल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येत आहे. या अपघाताचा अजूनही तपास सुरू असून, सरकारनेही सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.