
लोकशाही संपादकीय लेख
महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत दोन डिसेंबरला मतदान होऊन ईव्हीएम मध्ये बंद झाले. आता 21 तारखेला त्याचे निकाल जाहीर होतील. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुती अर्थात भाजपचे वर्चस्व दिसून आले. अनेक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले आहेत. सदर नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षात अनेक ठिकाणी राडे झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटपण्याचे प्रकार निदर्शनास आले. विरोधी पक्ष नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी बॅक फुटवर होता. पाचोरा, मुक्ताईनगर नगरपालिकेत महायुतीच्या शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगला. मुक्ताईनगर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात राडा झाला. आता 21 डिसेंबरला त्याचा निकाल जाहीर होईल. बाजी कोण मारतो? हे स्पष्ट होईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा दुसरा टप्पा म्हणजे राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा होय. या महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होऊन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका होतील. त्याकरिता महापालिका निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगाव महानगरपालिकासह सर्व 29 महानगरपालिकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी महायुती अर्थात भाजपची जोरदार तयारी चालू झाली आहे. जळगाव महानगरपालिकेत सत्ताधारी महायुतीतर्फे निवडणूक लढविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले असले, तरी महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे स्थान नगण्य आहे. शिवसेना शिंदे गटाला भाजपतर्फे किती जागा दिल्या जातील? हे बघावे लागणार आहे. परंतु एकूण 75 जागांच्या या महापालिकेत जास्तीत जास्त जागा भाजपकडून लढविल्या जातील यात शंका नाही. जागावाटपावरून शिवसेना शिंदे आणि भाजप यांच्यात वाद होऊन कदाचित त्यांच्या पुन्हा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जळगाव महापालिकेत मागील पंचवार्षिक निवडणुकीत 75 पैकी 57 जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. दरम्यान अडीच वर्षातच भाजपमधील नगरसेवकांमध्ये फूट पडली. भाजपच्या नगरसेवकांनी बंडखोरी करून शिंदे सेना गटात सामील होऊन भाजपची सत्ता स्थापन केली. बंडखोरी करणाऱ्या भाजप नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे. अद्याप त्याचा निकाल लागलेला नाही, हे प्रकरण प्रलंबित आहे. आता त्याचा निकालासाठी कोणी प्रयत्नही करणार नाही. त्यामुळे विधानसभा आमदारांच्या अपात्रता निकालाच्या प्रलंबन प्रकरणा प्रमाणे नगरसेवक अपात्र प्रकरण टांगणीवर पडले आहे. आता या अपात्रता प्रकरणावर कुणालाही स्वारस्य राहिलेले नाही.
जळगाव जिल्ह्यात भाजप पक्षात ज्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षातून इन्कमिंग झालेले आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मोठ्या प्रमाणातील इन्कमिंग केलेले कार्यकर्ते भाजपच्या तिकिटावर डोळा ठेवून भाजपमध्ये प्रवेश केलेले आहे. त्यामुळे त्यांना तिकीट दिले गेले तर भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज होतील यात शंका नाही. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी होणार नाही, याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. ती बंडखोरी टाळण्यासाठी तिकीट वाटपात समतोल साधणे आवश्यक आहे. त्यासाठी सोमवार दिनांक 15 डिसेंबर पासून भाजपाकडून संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे जिल्हा निवडणूक प्रभारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारी आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या मुलाखती म्हणजे त्या त्या नेत्यांसाठी कसरतच राहणार आहे. कारण मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड क्र्त्नाना अत्यंत कसब लागणार आहे. बंडखोरी टाळण्याच्या या प्रमुख बाबींकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे. भाजपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रवेश मिळालेल्या माजी नगरसेवकांचा मुद्दा सुद्धा कळीचा ठरणार आहे. कारण माजी महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे एकाच घरातील दोघे नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत. एका घरात एकाच उमेदवाराला तिकीट देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे महाजन परिवारात एकच तिकीट मिळणार आहे. त्याचबरोबर जळगाव महानगरपालिकेत विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढणे हे सुद्धा भाजपसोबत मोठे आव्हान राहणार आहे..!

