महायुतीची २१२ जागांवर मुसंडी
फडणवीसांचा प्रभाव कायम; भाजप ठरतोय सर्वात मोठा पक्ष

मुंबई / वृत्तसंस्था : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असताना महायुतीने निर्णायक आघाडी घेतली असून तब्बल २१२ जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने वर्चस्व राखत सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची छाप पुन्हा एकदा दिसून येत आहे.
आतापर्यंत उपलब्ध निकालांनुसार भाजप १२७ पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडीला सुमारे ५४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काही ठिकाणी मतमोजणी अंतिम टप्प्यात असून भाजपची आघाडी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपालिकेत भाजपच्या गीता पवार यांनी विजय मिळवला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी नगरपालिकेत भाजपचे अभय आव्हाड यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत बाजी मारली आहे. या निकालांमुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातही भाजपची पकड भक्कम असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून रविवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या रजनी सावकारे या आघाडीवर असून प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
एकूणच नगरपालिका निवडणुकांच्या निकालातून भाजप व महायुतीची ताकद अधोरेखित होत असून राज्याच्या राजकारणात फडणवीस यांची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

