मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारकडून लहान मुले, विद्यार्थी, महिला, दिव्यांग व्यक्ती अशा अनेकांसाठी योजना अस्तित्वात आणल्या जातात. तसेच आता महिलांनी आर्थिक स्वावलंबी व्हावे यासाठी केंद्र सरकारने आता नवी योजना आणली आहे. या योजनेद्वारे महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत. जाणून घ्या नेमकी काय आहे योजना.
‘विमा सखी’ ही योजना केंद्र सरकारने काढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आगामी तीन वर्षांत 2 लाख महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असणे महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षणही 10वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. या काळात महिलांना स्टायपेंडही मिळेल. तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विमा सखींना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याचीही संधी मिळणार आहे.
स्टायपेंड किती मिळणार?
या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून 7 हजार रुपये मिळतील. दुसऱ्या वर्षी ही रक्कम 6 हजार केली जाईल. तर तिसऱ्या वर्षी स्टायपेंडची ही रक्कम 5 हजार रुपये होईल. महिलांनी आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर त्यांना कमीशनही दिले जाईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी दिली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल.