जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मिरारोड, भाईंदर येथे हजारों खान्देश वासिय नागरिक वास्तव्यास असल्याने येथील अनेक वर्षांपासून भाईंदर-जळगाव मागणीच्या प्रतिक्षेत असलेली बस अखेर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून १४ जानेवारी मकरसंक्रांतीपासून एसटी बस सुरु करण्यात आल्याने खान्देश वासियांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
दहिसर, ठाणे, मिरारोड, भाईंदर परिसरात धुळे, जळगाव जिल्ह्यातील बरेच रहिवासी व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणून बऱ्याच दिवसांपासून जळगाव बसची मागणी प्रवाशांकडून सुरू होती. म्हणून खास प्रवाशांच्या आग्रहास्तव रातराणी भाईंदर ते जळगाव बस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आली असून ही बस भाईंदर व जळगाव येथून रात्री ०९.०० वाजता सुटते व सकाळी ७.३० वाजेपर्यंत पोहते. भाईंदर, गोल्डन नेस्ट, काशिमिरा, ठाणे, खोपट, शहापूर, नासिक, मालेगाव, धुळे जळगाव या मार्गाने बस बसचा प्रवास असून सदर बसचा शुभारंभ १४ जानेवारी मंगळवार रोजी मकरसंक्रांतीच्या गोड मुहूर्तावर सदर बस सजवून भाईंदर आगारातून ठाणे आगार प्रमुख सचीन पवार,ठाणे विभाग नियंत्रक सागर पळसुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बस सुरु करण्यात आली.
यावेळी डॉ. दिनेश पाटील, पराग चितोडकर, शरद खोसरे, गणेश वाडीले, डॉ. निलेश पाटील, राजेंद्र चौधरी, एकनाथ बोरसे, वसंत निंबाळकर, गणेश पाटील, देवेंद्र पाटील, प्रमोद धनगर, राजेश बोरसे, संतोष सैंदाणे, पांडूरंग मोरे, सुनील पाटील, विवेक पवार, बापूराव पाटील, प्रणिल चौधरी, ममता सरदेसाई, रुचिका पाटील उपस्थित होते.
नव्याने सुरु करण्यात आलेल्या या बसचे वाहक चालक यांचा खान्देश वासियांकडून सत्कार करण्यात आला. ब-याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जळगाव बस सुरु झाल्याने दहिसर, ठाणे, मिरारोड, भाईंदर परिसरातील खान्देश वासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे असून महाराष्ट्र शासनाचे खान्देश वासियांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे.