पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठेंच्या कवितांच्या प्रकट वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हा कार्यक्रम शाळेतील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सादर केला. ‘माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होते या कायली’ या छक्कडने सुरुवात करत प्रीती मॅडम यांनी रसिकांची मने जिंकली. ‘जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव’ राकेश धनगर यांनी सादर केलेल्या या कवितेने अण्णाभाऊंचा विद्रोह जागा झाला. अनिता पाटील यांनी ‘दीड दिवस तो शाळेत गेला’ या कवितेच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे जीवन प्रवास उलगडला. दिपश्री कुलकर्णी यांनी ‘गेय’ कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोबतच लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करण्यात आलं. सोनी झवर,आरती पाटील, सोनाली पाटील, रोशनी मॅम, भागवता सोनवणे, वृषाली पाटील, जयश्री चौधरी, योगेश्वर शिंदे यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर आपल्या वकृत्वातून प्रकाश टाकला.
शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी सुरेख सादरीकरण केले. शोषितांचा, दुःखी पीडिताचा करारी बाणा म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करणारे शिक्षक, थोर समाज सुधारक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोन्ही महात्म्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सादर केलेला हा अनोखा कार्यक्रम कानांचे, मनाचे आणि डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक विक्रमराव पाटील,भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.