जिल्ह्यातील ११५९ ग्रामपंचायतीमध्ये शासकीय योजनांचा २६ जानेवारी पर्यंत जागर ; १५५ ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी घेतला लाभ
जळगाव ;- विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ जळगाव जिल्ह्यातील गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी आज लोकशाहीशी बोलतांना केले. जिल्ह्यातील सर्व गाव आणि ग्रामपंचायतीमध्ये १० व्हॅन दिवसभरात प्रत्येकी २ ग्राम पंचायत याप्रमाणे २६ जानेवारी पर्यंत तळागाळातील वंचित असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत केंद्र शासनाच्या १७ विविध योजना पोहचविणार असून जिल्ह्यात ११५९ ग्रामपंचायती असून आतापर्यंत १५५ गावांमध्ये हि यात्रा पोहचली आहे. या योजनांमध्ये ड्रोन योजना, पीएम आवास योजना,आयुष्मान भारत,पीएम गरीब अन्न योजना, अटल पेन्शन ,फर्टिलायझर , एकलव्य मॉडेल स्कुल ,जनधन योजना, शिष्यवृत्ती योजना , वन धन विकास योजना, यासारख्या योजना राबविण्यात येत असून सुमारे एक लाख लोकांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट असल्याचे अनिकेत पाटील यांनी सांगितले.
यावेळी अनिकेत पाटील यांनी यांनी कृषी, आरोग्य, महसूल यांसह इतर विभागांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावात पोहचविण्यासाठी विकास यात्रारथ गावोगावी फिरणार आहे, असे सांगितले. या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केले असून २६ जानेवारीपर्यंत ‘हमारा संकल्प, हमारा भारत’ हा कार्यक्रम देशभरात राबवला जाणार आहे.
या यात्रेत १० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. १७ विभाग आणि १७ योजना असे या यात्रेचे स्वरूप आहे. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवली जाईल, वंचित लाभार्थींची नोंदणी केली जाईल व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील यांनी केले.