आष्टी, लोकशाही न्यूज नेटवर्क
अजूनही समाजात अनिष्ठ रूढी परंपरा आहेत. चक्क एचआयव्हीच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना बीडच्या आष्टीत घडली आहे. या अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला आहे. मुलीला एचआयव्हीने मृत्यु झाला होता. अशी खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली, गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकलं, कोणीही भेटत नाही जवळ येत नाही अशी आपबिती पीडित कुटुंबाने सांगितली.
या घटेनेने बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. एचआयव्हीच्या अफवेमुळे पीडित कुटुंबातील महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. तर कुटुंबासोबतचे व्यवहार लोकांनी थांबले असल्याचं पीडित कुटुंबचं म्हणणं आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून आष्टी रुग्णालयातील डॉ.ढाकणे, आणि पोलीस कर्मचारी बीट अमलदार काळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. यासंदर्भात पीडित कुटुंबाने एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे. यात पोलीस कर्मचारी काळे हा तुमच्या मुलीला एचआयव्ही होता असं सांगत आहे. तिच्या अंत्यविधीला जवळ जे व्यक्ती होते त्यांची तपासणी करुन घ्या, अशी भीतीही दाखवली जातेय.
मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलीस आणि डॉक्टरांनी अशा पद्धतीने खोटं सांगितलं. त्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. गावाने वाळीत टाकले आहे, कोणीही जवळ येत नाही बोलतही नाही, यांना एचआयव्ही आहे. असं बोलत आहेत, त्यामुळे माझी पत्नी दोन वेळा आत्महत्येसाठी गेली होती, असं पीडित कुटुंबातील व्यक्तीने सांगितलं.
आमची मुलगी मरण पावली पण आमच्या जवळचे देखील भेटायला आले नाही. आता आजार आहे अशा अफवेने म्हटल्यावर घरातील मुलं देखील जवळ येत नाहीत. फक्त अफवेमुळे आमच्या वाट्याला हे दुःखाला आहे, आम्हाला न्याय द्या अशी मागणी महिलेने केली आहे. आष्टीमधील या प्रकाराची बीडमध्ये जोरदार चर्चा होत आहे.
दरम्यान या प्रकरणात पीडित कुटुंबाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून पोलिस आणि आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिल्याने आमच्या कुटुंबाची बदनामी झाली असून लोकांमध्ये सांगितल्याने लोक आम्हाला जवळ करत नाहीत. सासरच्या मंडळाच्या सांगण्यावरून हे केलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.