धानोरा, ता. चोपडा
परिसरात सध्या अचानक भारनिमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक त्रस्त झालेले आहेत. वारंवार बत्ती गुल होत असतांना देखील धोनोरेकर मात्र कुल कुल (शांत) असल्याने कंपनीचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. कार्यकारी अभियंत्यांपासून ऑपरेटर, वायरमन कुणाचेही फोन घेत नसल्याने लार्इट येर्इल केव्हा हे कुणीही सांगत नसल्याने शेतीची नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. परिसरातील विविध राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी हात वर केल्याने या गंभीर समस्येला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित रहात आहे.
‘लाईट कधी येणार?’ हा साधा प्रश्न सध्या धानोरा परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कोडे ठरला आहे. अचानक होणाऱ्या भारनिमनामुळे गावोगावी अंधार पसरतो, पाण्याची मोटार थांबते, घरातील उपकरणे बंद पडतात आणि सर्व नियोजन कोलमडते. पण या सर्व गोंधळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी मात्र ‘कुल. . . कुल’ शांत आहेत. परिणामी नागरिकांचा संताप दिवसेंदिवस उफाळून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून धानोरा व परिसरात कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. दिवस असो वा रात्र, शेतात पाणी देण्याची वेळ असो वा विद्यार्थ्यांची अभ्यासाची वेळ अचानक बत्ती गुल होते आणि तासन्तास वीज परत येत नाही. शेतीसाठी पाणी सोडायचे की नाही, हेच ठरवता येत नाही. रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मोटारीजवळ थांबून राहावे लागते, अशी व्यथा शेतकऱ्यांची आहे.
रब्बी हंगाम उंबरठ्यावर असताना वीजपुरवठ्यातील अनियमितता शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरला आहे. ठराविक वेळेत पाणी न मिळाल्यास पिकांवर परिणाम होतो. केळी, कांदा, मका, भाजीपाला यासारख्या पिकांना नियमित पाणी आवश्यक असते. परंतु वीज नसल्याने मोटारी बंद राहतात आणि पिके तहानलेलीच राहतात. वीजेच्या लपंडावामुळे उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही वाढली आहे. मोटारी जळणे, स्टार्टर बिघडणे, डीपीवर ताण येणे असे प्रकार वाढत असल्याची तक्रारही होत आहे. शेतकरीच नव्हे, तर दुकानदार, छोटे व्यावसायिक, विद्यार्थी आणि गृहिणी यांनाही या समस्येचा फटका बसत आहे. दुध व्यवसाय, किराणा दुकाने, थंडगार पेये व आइस्क्रीम विक्रेते यांचे नुकसान होत आहे. ऑनलाईन व्यवहारांच्या काळात वीज नसल्याने इंटरनेट सेवा ठप्प होते. परिणामी व्यवहार अडकतात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. बोर्डाच्या परीक्षा सुरु असून वारंवार होणाऱ्या अंधारामुळे अभ्यासात खंड पडत आहे.
अधिकारी फोन घेर्इना अन् लोकप्रतिनिधी झोपेत!
वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांपासून ऑपरेटर व वायरमनपर्यंत कुणीही फोन घेत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वीज कधी येणार, दुरुस्तीचे काम सुरू आहे का, भारनिमन किती वेळ चालणार याची कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही. कार्यालयात गेल्यास वरून लार्इट बंद आहे असे उत्तर मिळते. परिसरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केले असून नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे हाच प्रश्न आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेले लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तळपायाची आग मस्तकी भिडली आहे.

