दीपक कुलकर्णी
जळगाव
जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे सावट दाटून आले आहे. बाजारात चांगला दर असतानाही प्रत्यक्ष व्यवहारात मात्र शेतकऱ्यांना अत्यल्प दर दिला जात आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली जात असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करुन कारवार्इ करावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणी आमदार अमोल जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
जळगाव हा केळी उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. येथे उत्पादित होणाऱ्या केळीची मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत तसेच परदेशात निर्यात होते. त्यामुळे केळी हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा मानला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत हाच कणा डळमळीत होताना दिसत आहे. सध्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील प्रमुख मंडईत केळीला प्रति क्विंटल सुमारे 1600 ते 1700 रुपये दर मिळत आहे. परंपरेनुसार जळगावमधील केळीचे दर हे याच मंडईच्या दरांवर आधारित असतात. परंतु वास्तव चित्र पूर्णतः वेगळे आहे. जिल्ह्यातील काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केळीची खरेदी फक्त 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दराने करत असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच जवळपास अकराशे रुपयांचा फरक पडत आहे.
या प्रचंड दरघटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि खतांच्या वाढत्या किमती यामुळे आधीच शेतकरी अडचणीत आहे. त्यातच बाजारभाव आणि प्रत्यक्ष मिळणारा दर यातील एवढा मोठा फरक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. या परिस्थितीची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. व्यापाऱ्यांकडून होत असलेल्या कथित अन्यायकारक व्यवहारांची सखोल तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
बाजारात दर चांगले असतानाही स्थानिक पातळीवर संगनमत करून दर पाडले जात असल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे. काही व्यापारी परिस्थितीचा फायदा घेत शेतकऱ्यांना कमी दरात माल विकण्यास भाग पाडत असल्याचेही आरोप होत आहेत. विशेषतः लहान व मध्यम शेतकरी यामध्ये सर्वाधिक भरडले जात आहेत. या प्रश्नाचा व्यापक परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही. केळी उत्पादनाशी संबंधित संपूर्ण पुरवठा साखळी मजूर, वाहतूकदार, पॅकिंग उद्योगयावर याचा परिणाम होत आहे. जर शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला नाही, तर भविष्यात उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याचा परिणाम बाजारावरही होऊ शकतो. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने हस्तक्षेप करणे अपेक्षित आहे.
‘‘बऱ्हाणपूर मंडीमध्ये केळीचा दर साधारणत: 1600 ते 1700 रुपये प्रति क्विंटल असून जिल्ह्यात काही व्यापारी शेतकऱ्यांकडून केवळ 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहेत. हा दर अत्यंत अन्यायकारक असून, यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना केळीला योग्य व न्याय्य बाजारभाव मिळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात.
– अमोल जावळे, आमदार

