लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या वाढतच असून उन्हाळ्याच्या तोंडावर बळीराजाला वीज वितरण कंपनीतर्फे शॉक दिला जात असून रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. बऱ्याच ठिकाणी अचानक वीज पुरवठा खंडीत होत असतो. दरम्यान, शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी जोर धरत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा तीव्र झाल्या आहेत. पाण्याची टंचाई, वाढते तापमान आणि शेतीच्या खर्चाचा वाढता ताण यामध्ये आता वीज भारनियमनाची भर पडली आहे. रात्रीच्या वेळेत होणारा अनियमित वीज पुरवठा आणि अचानक खंडित होणारी लाईट यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. परिणामी, शेतीपिकांचे संरक्षण आणि पाण्याचे नियोजन करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे शेतीपंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आता जिल्हाभरातून जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात शेतीसाठी वीज पुरवठा प्रामुख्याने रात्रीच्या वेळेत दिला जातो. परंतु हा पुरवठा ठराविक वेळेत न राहता कधीही सुरू होतो आणि कधीही खंडित होतो. अनेकदा मध्यरात्री अचानक वीज येते आणि काही तासांतच बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री झोप मोडून शेतावर जावे लागते. काही वेळा वीज येण्याची खात्री नसल्याने शेतकरी रात्रभर शेतात थांबून राहतात. उन्हाळ्यात सर्पदंश, वन्य प्राण्यांचा धोका आणि अपघातांची शक्यता वाढलेली असतानाही शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांसाठी पाणी द्यावे लागत आहे.
संकट झाले गळद!
जिल्ह्यात केळी, मका, भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर आहेत. या पिकांना योग्य वेळी पाणी मिळणे अत्यंत आवश्यक असते. मात्र वीज पुरवठ्याच्या अनियमिततेमुळे पाणी देण्याचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. विशेषतः ठिबक सिंचन किंवा मोटारपंपावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. काही ठिकाणी वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तो खंडित होतो. त्यामुळे मोटार वारंवार सुरू-बंद करावी लागते आणि त्यातून मोटार जळण्याचे प्रकारही घडत आहेत.
रात्रीच खेळ चाले!
अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रात्री 12 वाजता वीज येते, कधी 2 वाजता येते तर कधी अजिबातच येत नाही. आम्हाला झोप मोडून शेतावर जावे लागते. पाणी देण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागते. दिवसा वीज दिली तर आम्ही व्यवस्थित नियोजन करून शेती करू शकतो, अशी प्रतिक्रिया अनेक शेतकरी देत आहेत. दिवसा वीज दिल्यास अनेक समस्या आपोआप कमी होतील. रात्रीच्या वेळी शेतावर जाण्याचा धोका टळेल, पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता येईल आणि विजेच्या वापरावरही नियंत्रण ठेवता येईल. शिवाय दिवसा मोटारपंप चालवताना बिघाड झाल्यास लगेच दुरुस्ती करता येते. मात्र रात्रीच्या वेळी अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने नुकसान अधिक होते.
बागायती शेतीला फटका
जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे. केळीच्या बागांना नियमित पाणी देणे अत्यंत आवश्यक असते. जर पाण्याचा तुटवडा झाला तर उत्पादनावर थेट परिणाम होतो. सध्या अनेक भागात केळीच्या बागांमध्ये पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यातच तापमान वाढत असल्याने पिकांवर ताण वाढत आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादन घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी संघटनांनीही या प्रश्नावर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील विविध संघटनांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदने देऊन शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी केली आहे.

