लोकशाही न्यूज नेटवर्क

“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्याचा आवाज दिला, स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली आणि जनतेच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याचे बळ दिले. त्यांच्या विचारांची सावली आजही आमच्या डोक्यावर आहे. बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने चालत जनतेची सेवा करत राहणे, हीच त्यांच्या चरणी अर्पण केलेली खरी गुरुदक्षिणा आहे,” असे भावनिक प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आयुष्याला जन्म आई देते; मात्र आयुष्याला विचार, ध्येय आणि दिशा देणारा गुरु असतो. माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांच्या मनात स्वाभिमान जागवणारे, अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणारे आणि जनसेवेचा मार्ग दाखवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आमचे गुरु आणि अखंड प्रेरणास्थान आहेत.”
ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार हे कोणत्याही पदापेक्षा मोठे आहेत. गोरगरीब, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत राहणे, हीच त्यांच्या चरणी अर्पण केलेली माझी खरी गुरुदक्षिणा आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे बाळकडू घेत एका सामान्य शिवसैनिकापासून मंत्रिपदापर्यंतचा प्रवास करण्याचे भाग्य लाभल्याची भावना व्यक्त करत त्यांनी सांगितले, “आज सार्वजनिक जीवनात मिळालेली प्रत्येक जबाबदारी आणि जनतेने व्यक्त केलेला विश्वास यामागे बाळासाहेबांनी दिलेले विचार, संस्कार आणि संघर्षाची प्रेरणा आहे.”
पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “बाळासाहेबांनी आम्हाला केवळ राजकारण नव्हे, तर माणसे जोडायला, संकटात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला आणि स्वाभिमानाशी कधीही तडजोड न करण्याची शिकवण दिली. त्यांचे विचार, त्यांचा करारी आवाज आणि शिवसैनिकांवरील पितृतुल्य माया आजही आमच्या हृदयात जिवंत आहे.”


