आयुर्वेदाचा संक्षिप्त इतिहास

0

लोकशाही, विशेष लेख

“गदनिग्रह (Gadnigraha)” या आयुर्वेद विषयक ग्रंथात वामदेव ऋषींचा (Vamdev Rishi) एक भाग प्रसिद्ध आहे. गौतम ऋषीचा आयुर्वेद विषयक ग्रंथ उपलब्ध नाही. परंतु माधवनिदान या ग्रंथावर व्याख्या करणारे श्री विजयरक्षित यांनी गौतम ऋषींच्या वचनांचा उल्लेख केला आहे.

चरक संहितेत सांगितले आहे की लोक – कल्याणाच्या अपेक्षेने (आकांक्षेने) ऋषी लोकांनी भारद्वाज ऋषींना आपले प्रतिनिधी म्हणून इंद्रदेवांकडे पाठवले व इंद्रदेवांनी भारद्वाज ऋषींना आयुर्वेदाचा उपदेश केला. (संदर्भ- सूत्रस्थान – १) त्यानंतर सर्व ऋषींनी मिळून हा आयुष्य वाढविणारा वेद भारद्वाज ऋषींकडून शिकून घेतला. इंद्रदेवांकडून मिळवलेले ज्ञान भारद्वाज ऋषीनी तंत्र रुपाने निबद्ध केले. असे भावप्रकाश या ग्रंथात सांगितले आहे. (१.१५) या शिवाय भेषज कल्प व भारद्वाजीय प्रकरण’ हे सुद्धा त्यांचे ग्रंथ हस्तलिखित रूपात मद्रास येथील ग्रंथ भांडारात आहेत.

भारद्वाज ऋषींकडून जे द्वितीय धन्वंतरी यांनी भिषक क्रियेसहित आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त करून घेतले. नंतर त्यांनी आयुर्वेदाचे आठ विभागात विभाजन केले व त्यांचे अध्यापन आपल्या शिष्यांना केले. या धन्वंतरी देवांना सर्वरोग प्रनाशन व आयुर्वेद प्रवर्तक अशा पदव्या आहेत. त्यांनी शल्यशास्त्राचा प्रसार केला. सन्निपातकालिका धातू कल्प, रोग निदान, वैद्य चिंतामणी, धन्वंतरिनिघंटू इ. ग्रंथ द्वितीय धन्वंतरी यांनी लिहिलेले आहेत.

भारद्वाज महर्षी यांचे दुसरे शिष्य म्हणजे पुनर्वसु आत्रेय हे होते. चरक संहितेत असा उल्लेख आढळतो की हे पुनर्वसु आत्रेय महान जिज्ञासु होते. अनेक ऋषींना बरोबर घेऊन औषधी वनस्पतींची पाहणी करीत असत. तसेच हिमालयात भ्रमंती करून फिरता-फिरताच आपल्या शिष्यांना ज्ञानदान करीत असत. (संदर्भ-बावर हस्तलेख) अत्रेयाचे ते एक हिंडते फिरते आयुर्वेद विद्यालयच होते. चरकसंहितेत पुनर्वसु आत्रेयाला जी अनेक विशेषणे लावली जातात, त्यांत भिषग्विद्या प्रवर्तक असे एक विशेषण आहे. भिषग्विद्या याचा अर्थ इथे कायचिकित्सा असं आहे. पुनर्वसूचे सहाध्यायी धन्वंतरी यांनी भिषक क्रिया म्हणजे शल्यतंत्र हस्तगत करून घेतले. तर पुनर्वसु यांनी भिषक विद्येचा पुरस्कार केला. अग्निवेश, भेल, जतूकर्ण, पराशर, हारीत, व क्षारपाणी असे आत्रेय ऋषींचे सहा प्रमुख शिष्य होते. त्या सर्वांनी एकाच काळी अध्ययन. नंतर प्रत्येकांनी ग्रंथ रचले. अनेक ऋषींची व आचार्याची सभा भरली. सर्व शिष्यांनी रचलेली तंत्रे त्या सभेत वाचून दाखविण्यात आली. सर्व ऋषींनी ती समंत केल्या नंतरच ती प्रसिद्ध करण्यात आली.

या सर्व तंत्रामध्ये अग्निवेश ऋषींचे तंत्र विशेष प्रसिद्ध झाले. या व्यतिरिक्त आत्रेय ऋषींच्या अध्यक्षतेखाली आणखी तीन वाद सभा झाल्याचा उल्लेख चरक संहितेत आहे. आत्रेय ऋषींनी (Atreya Rishi) जी आयुर्वेद (Ayurveda) विषयक संहिता लिहीली होती तिची हस्तलिखीत उपलब्ध आहेत.

अग्निवेश हे सूक्ष्म बुद्धीचे होते. त्यांचे तंत्र आयुर्वेदाच्या आठही अंगांचा आढावा घेणारी आहे. ते कायचिकित्सा प्रधान होते. या शिवाय त्यांनी नाडीपरीक्षा व अग्निवेश हस्तिशास्त्र या नावाचे ग्रंथ सुद्धा लिहिले आहेत. आत्रेय ऋषींचे दुसरे शिष्य भेल हे होय. भेल या शब्दाचा पाठभेद – भेड असा आहे. भेड यांची संहिता छापलेली आहे. पराशर हे भेलाचे समकालीन होते. पराशर यांचे आयुर्वेदीय तंत्र हे कायचिकित्साप्रधान होते. वाग्भटाने (Vagbhat) पराशर तंत्र पाहिले होते. पराशर ऋषींनी आपल्या तंत्रात आर्याछंदाचा उपयोग केला आहे. पराशर यांचा हस्त आयुर्वेद, गोलक्षण, वृक्ष आयुर्वेद, कृषिशास्त्र या ग्रंथांचा अन्य ग्रंथात उल्लेख केला आहे.

जतूकर्ण हे आत्रेयाचे आणखी एक शिष्य होत. त्यांची जनुकर्णसंहिता कायचिकित्सापर होती. हा ग्रंथ सध्या उपलब्ध नाही

द्वारकाधीश दिगंबर जोशी
संस्कृत अध्यापक, जळगाव
0257-2236815

Leave A Reply

Your email address will not be published.