लोकशाही संपादकीय लेख

जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोकाट कुत्रे लहान मुले, मुली, तरुण व वयोवृद्ध यांना मोकाटपणे चावा घेत आहेत. आणि ही मंडळी कुत्रा चावल्यानंतर जे इंजेक्शन घ्यावे लागतात, त्यासाठी धडपड करतात. कुणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो, तर कोणी खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. काहींच्या बाबतीत तर लहान मुलांचा त्यात मृत्यूही होतो किंवा चिमुकल्यांचा लचका तोडल्याने ती विद्रूप स्वरूपात पाहायला मिळते. याबाबतीत नगरसेवक अरविंद देशमुख यांनी ज्वलंत प्रश्न स्थायी समिती सभेत उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, एका महिन्यात जळगाव जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांनी 300 जणांना चावा घेतला आहे. त्यापैकी 100 पेक्षा जास्त जळगाव शहरातील लोकांना चावा घेतला आहे. आपण महानगरपालिकेत म्हणून काय बंदोबस्त करतो, हे कळायला मार्ग नाही. डॉग स्कॉड आहे; पण डॉग स्कॉड कुत्रे पकडण्याऐवजी कोणते कार्य करतात, याची काही माहिती नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, एखादा कुत्रा एकाला चावला तर त्याचे काय हाल होतात, हे पाहत नाही. ते उपचारासाठी भटकत असतात. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातात, तेव्हा तेथे कुत्र्यांची लस शिल्लक नाही, असे उत्तर मिळते. त्यामुळे नाइलाजास्तव पेशंटला खाजगी रुग्णालयात जावे लागते. तेथे अव्वाच्या सव्वा पैसे त्याला मोजावे लागतात. एखादा गरीब पेशंट असेल, तर त्याला ते परवडणारे नसते. परंतु त्याला इलाज नाही. वेळेच्या आत इंजेक्शन घेणे महत्त्वाचे असते. म्हणून तो कर्जबाजारी होतो आणि कुत्रा चावल्यानंतर घ्यावी लागणारी लस घेतो. अशा परिस्थितीत महानगरपालिकेचे जे कार्य आहे, ते कार्य करणे महानगरपालिकेला विसर पडतो. डॉग स्कॉड नावालाच आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. आतापर्यंत किती कुत्र्यांना पकडून निर्बीज करण्यात आले आहे, याचा शोध घ्यायचा झाला तर काहीच नाही, असे उत्तर मिळते. मोकाट कुत्रे चौका-चौकात झुंडीच्या झुंडीने फिरत असतात; पण त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नसते. त्यांना पकडून निर्बीजीकरणाचे इंजेक्शन दिले पाहिजे. ते होते का, याचे उत्तरसुद्धा नाही, असेच मिळते. तेव्हा या डॉग स्कॉडचा उपयोग काय? ते जर शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडत नसतील, तर कुणाला पकडतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मोकाट कुत्र्यांपैकी एखादा कुत्रा मेला, तर त्याचा वास येईपर्यंत त्याला उचलले जात नाही. हेच का या डॉग स्कॉडचे काम आहे? लोकांच्या आरोग्याचा आपण विचार करणार आहात की नाही? लेकरांच्या आरोग्यावर आपण किती खर्च करतोय, याचा विचार केला तर अगदी नगण्य आहे, असे आपल्या निदर्शनास येते.
नगरसेवक अरविंद देशमुख यांनी स्थायी समितीमध्ये जो मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उचलला आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची तसेच त्यांच्या निर्बीजीकरणाची जबाबदारी ही महानगरपालिकेची आहे. पण महानगरपालिका मोकाट कुत्र्यांकडे लक्ष देत नाही. एवढा गंभीर प्रश्न असताना त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का होते, असा सवाल अरविंद देशमुख यांनी केला आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न फार पूर्वी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला होता. तेथे सुप्रीम कोर्टाने विविध शहरांतील मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्या त्या नगरपालिका व महानगरपालिकांची आहे. त्यांनी ती काटेकोरपणे सांभाळली पाहिजे. तसेच मोकाट कुत्र्यांकडून जर इतरांना चावा घेतला गेला, तर त्याची पूर्ण भरपाई देण्याची जबाबदारी त्या त्या नगरपालिका व महानगरपालिकेची आहे, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. या उपरोक्त निर्णयानंतरही जर त्या त्या महानगरपालिका अथवा नगरपालिकांकडून हे कार्य होत नसेल, तर त्याला त्या त्या महानगरपालिका व नगरपालिका जबाबदार असतील, असे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत. जळगाव शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्याबाबतीत चर्चा होते; पण ती चर्चा शेवटी चर्चाच राहते. त्याला ॲक्शन कधीही आलेली दिसून येत नाही. सकाळी सकाळी जे मॉर्निंग वॉक करायला जातात, त्यांच्या मागे हे मोकाट कुत्रे लागतात. त्यात जे वृद्ध असतात, ते पळू शकत नाहीत. म्हणून कुत्रे त्यांचा चावा घेतात. या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेच्या सभेत यावर चर्चा होते; पण त्याबाबत उत्तर मिळत नाही. महापालिकेतील नगरसेवक प्रश्न विचारतात; पण त्यांना उत्तर मिळत नाही. तेव्हा जर नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, तर महानगरपालिकेची लोकांप्रती भूमिका प्रश्नांकित राहते. मग जर लोकांचे प्रश्न सुटत नसतील, तर नगरसेवकांच्या प्रश्नांचा काय अर्थ उरतो? कशाला हवी स्थायी समिती किंवा स्थायी सभा, जर नगरसेवकांच्या प्रश्नांचे पालन अधिकाऱ्यांकडून होत नसेल? तर ते अधिकारी काय कामाचे? यामध्ये नवे आयुक्त आदित्य जीवने यांनी लक्ष घालावे आणि नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात की नाही, याची शहानिशा करावी. अन्यथा, “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय,” अशातला प्रकार होईल. यानिमित्त नगरसेवक अरविंद देशमुख यांनी एका महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा यापुढे शहरातून बंदोबस्त होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे..!


