चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
दि. 29/08/2022 रोजी चाळीसगांव कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्ट जवळ 100 मीटर अंतरावर खोल दरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदर तपास स.पो.नि हर्षा जाधव हे करीत होते.
सदर अनोळखी मयताचा चेहरा पूर्णपणे कुजलेला असल्याने त्याच्या चेहऱ्याचा फोटो काढून तो फोटोग्राफर अनिकेत जाधव यांच्याकडून डेव्हलप करुन चेहरा थोडा स्पष्ट केला व त्यावरुन तसेच मयताच्या कपड्यांवरून ओळख पटविण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले. तपासात तो मृतदेह मधूकर रामदास बुटाले, (45) रा. न्यायनगर, पुंडलीक नगर, औरंगाबाद येथील रहिवासी असल्याचे समजले. दरम्यान बुटाले यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. मारेकरीचा कोणताही मागमूस नसतांना चाळीसगांव ग्रामीण पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविली. त्यासाठी गुप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने दि. 30/09/2022 रोजी सदर मयताच्या मारेकऱ्यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.
त्यांचे मारेकरी दुसरे कोणी नसून त्यांचा मेहूणा गोपाल शंकर पंडीत, (32) व त्याचा मित्र कृष्णा रामदास भोसले, (25) दोन्ही रा. औरंगाबाद हे निघालेत. गोपाल पंडीत याने मयत बुटाले कदाचित मुलगीकडे औरंगाबाद वरून धुळे येथे जाण्यासाठी निघाला असावा व कन्नड घाटात उतरून दारुच्या नशेत घाटात पडला असावा, अशी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी आपल्या पद्धतीने पुन्हा विचारपूस केली असता आरोपीने कबूल केले की, दि. 27/08/2022 रोजी ते दोघे मयतासोबत औरंगाबाद रामगिरी हॉटेल येथून आरोपी गोपाल पंडीत याची रिक्षा क्र. एमएच 20 ईएफ-7984 मध्ये बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असतांना. 5000/- रुपये देण्याच्या वादावरुन कृष्णा भोसले व मयत मधूकर बुटाले यांच्यात चिखलठाणा पो.स्टे हद्दीत वरुड गावाजवळ रिक्षातच भांडण सुरु झाले. यादरम्यान कृष्णा भोसले याने मयत मधूकर बुटाले यांचा गळा आवळून खून केला व बुटाले याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी मृतदेहाला त्याच रिक्षाने औरंगाबाद येथून कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्टजवळ दरीत फेकून दिला होता. सध्या दोन्ही आरोपी हे चाळीसगांव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असून त्यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, जळगांव, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संजय टेंगे, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती हर्षा जाधव, पो.हे.कॉ युवराज नाईक, पो.ना शांताराम पवार, सफौ राजेंद्र साळुंखे, पो.हे.कॉ नितीन सोनवणे, पो.ना शंकर जंजाळे, पो.ना संदिप माने, पो.ना मनोज पाटील, पो.ना प्रेमसिंग राठोड, चालक स.फी अनिल आगोणे यांनी केली.