लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजितदादांची आठवण काढताना मुख्यमंत्री भावुक झाले. यावेळी त्यांनी अजितदादांनी केलेल्या योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी अजित पवार यांचे भव्य स्मारक बांधले जाईल आणि त्यांच्या नावाने गतीमान नागरी सेवा पुरस्कार दिला जाईल अशी मोठी घोषणा केली. यावेळी विधानसभेमध्ये ‘अजितदादा अमर रहे अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवारांची आठवण काढताना सांगितले की,’भाषण करताना माझे मन जड झाले आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपद आणि दीर्घकाळ वित्त विभागाची धुरा सांभाळलेले राज्याचे लाडके नेते अजित पवार आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात आणि प्रशासनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी एकूण ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजितदादा आणि अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्यामुळे महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळातही स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसंच, त्यांच्या नावे गतीमान नागरी सेवा पुरस्कार दिला जाईल. दिवंगत अजितदादांच्या स्मृतीला आजचा अर्थसंकल्प समर्पित करतो.’
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की, ‘संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी आणि अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्र जोडून संत गाडगेबाब तीर्थस्थळ सर्किट विकसित केले जाईल. ग्रामीण भागाच्या सर्वसमावेक्षक विकासासाठी प्रमुख राज्यस्थरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाब ग्रामसमृद्धी अभियान राबवले जाईल. तसंच,संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत ७५ गावांमध्ये कृत्रिम बद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शि प्रकल्प राबवण्यात येईल.’
तसंच,’भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चौदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी सुविधांकरता विकास आराखडा तयार केला जाईल. महात्मा फुले, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे हे वर्ष लक्षात घेता २०२६- २०२७ हे वर्ष सामाजिक, समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल. त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहेत. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजना राज्य सरकार सुरू करणार आहे.’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

