“पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे”. असे दलित साहित्य संमेलनात उदघाटन भाषणादरम्यान ठणकावून सांगणारे समाजसुधारक, शाहीर अण्णा भाऊ साठे होय.अण्णा भाऊ साठे यांच्या मृत्यूनंतर अगदी ५० वर्षानंतर देखील ते सत्यकथन आजही लागू पडते आहे. तत्कालीन काळातील कवी, लेखक यांच्यापेक्षा निराळे व्यक्तिमत्व म्हणून ठसा उमटविणारे लोककवी होते. खरे तर त्यांचा जन्म १ आगस्ट १९१९ चा मांग जातीत जन्म झाला. अण्णा भाऊ साठे अशिक्षित होते असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही. केवळ दीड दिवस शाळेत गेल्यावर सवर्ण लोकांकडून होत असलेला अन्याय त्यांनी स्वतः उपभोगला आहे त्यामुळे त्यांच्या लेखनाचा विषय हा ज्वलंत, जळजळीत, प्रखर लोकाभिमुख अनुभव त्यांनी मांडला. दलित व कामगार वर्गाच्या भोगलेल्या कथा त्यांनी प्रथमतः समाजासमोर मांडल्याने दलित साहित्याचे प्रणेते ठरले.
जीवन जगत असतांना जसे अनुभव घडत गेले तसेच अनुभव शब्द तलवारीने मांडत गेले. त्यामुळे समाजाला, दलिताला दिशा व प्रेरणा देणारे ठरले. प्रथमतः साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असलेले समाजसुधारक ते नंतर मार्क्सवादी, आंबेडकरवादी विचारसरणीचा अधिकाधिक प्रभाव त्यांच्यावर पडला. अण्णा भाऊ साठे यांचे लिखाण सामाजिक, राजकीय कृतीशीलतेवर अधिक भाष्य करणारे होते. भारतीय जनतेवर कधी ब्रिटिशांचा अंमल, अत्याचार, जुलूम, जबरदस्ती, हेळसांड होत होती. तशीच जनतेच्या मनातील घालमेल घालविण्यासाठी दलितांना समाजात स्थान मिळवून देण्यासाठी साहित्याचा आधार घेतला त्यामुळे दलित वर्गातील पिढ्यानपिढ्या शोषित वर्गाला दिशा, प्रेरणा, परिवर्तन घडविण्यासाठी लालबावटा कलापथकाचा आधार घेऊन प्रबोधन केले.

तुकाराम भाऊराव साठे त्यांच्या अनुभवधारीत कथा, कादंबरीने अल्पावधीतच अण्णाभाऊ साठे झाले. साम्यवादी विचारसरणीत असतांना इंडियन पीपल थिएटर असोसिएशन अंतर्गत सांस्कृतिक शाखेचे प्रमुख असतांना मूठभर उच्चवर्णीय लोकांचे भारतीय जनतेवर असलेले शासन यामुळे रोष व्यक्त करतांना म्हणतात की, “ये आझादी झुठी है, देश की जनता भुखी है”. अश्या या घोषवाक्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईच्या भररस्त्यात सांगणारे लोकशाहीर, लोककवी अण्णा भाऊ साठे होते.
मुंबई महाराष्ट्रातच विलीन व्हावी यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर गवाणकर व अमर शेख यांच्या सहकार्याने खळबळ माजवून दिली. त्यांच्या कथा, कादंबरी, पोवाडा, लावणी, नाटक, लघुकथा, कविता ह्या आपल्या दलित समाजाच्या भोगलेल्या यातनेचा विषय असल्याने दलित साहित्याचा आत्माच होता म्हणून दलितांची होत असलेली पिळवणूक, होत असलेला अन्याय, अत्याचार याला वाचा फोडण्यासाठी उपसलेले साहित्य म्हणजे जगलेला लेखाजोगा होता. जगलेल्या ५० वर्षाच्या काळात ३५ हुन अधिक पुस्तके लिहिली आहेत. आज तीच पुस्तके आमच्यासारख्या कित्येक विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा विषय बनलेला आहे.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जन्मणारे लावणीकार अण्णा भाऊ साठे यांच्या अनेक कादंबरीवर चित्रपट निघाले आहेत. वैजयंता, टिळा लावते मी रक्ताचा, डोंगराची मैना यासारखे चित्रपट निघाले आहेत. ‘माझा रशियातील प्रवास’ देखील प्रवास वर्णन देखील अत्यंत महत्वपूर्ण साहित्य आहे. ब्रिटिशांच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी संबोधित करणाऱ्या ‘फकिरा’ या नायकाला फाशीवर चढावे लागते. ‘फकिरा’ ही त्यांची गाजलेली कादंबरी आजही दलित समाजातील लोकांवर अन्याय झाल्यास पेटून उठण्याचे बळ देते. त्या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा ‘उत्कृष्ट कादंबरी’ म्हणून गौरविण्यात आले आहे.
आजही त्यांचे साहित्य दलितांनाच नाही तर इतर समाजातील लोकांना देखील प्रेरणास्रोत, विचारप्रवर्तक, विचारप्रवण आहेत म्हणूनच दलित साहित्याचे प्रणेते म्हणून त्यांना गौरविल्यास उचित व योग्य होईल. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून जन्मशताब्दी निमित्य २०१९ मध्ये टपाल तिकिटावर झळकले ते त्यांच्या जळजळीत वास्तव अनुभव कथेच्या लिखाणानेच म्हटले तर वावगे वाटणार नाहीच.
शब्दांकन – दुशांत बी. निमकर
गोंडपीपरी जिल्हा चंद्रपूर
मो. नं. :- ९७६५५४८९४९


