प्रेमसंबंधाच्या संशयावरून तिघांवर चाकू हल्ला

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील जानवे येथे प्रेमसंबंधाच्या संशयावरून एकाने तिघांवर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील जानवे येथे २४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय उर्फ भाया साहेबराव पारधी यांनी दवाखान्यातून जबाब दिला की २४ रोजी रात्री १० वाजता गल्लीत मावस बहिणीच्या आरडाओरडचा आवाज आला. म्हणून तेथे जाऊन पाहिले असता अजय मंगल पारधी हा विजयची मावस बहिण सुनीता, पती राजेंद्र व मुलगा भटू यांना शिवीगाळ करत होता. भटुवर प्रेमसंबधाचे आरोप करीत त्याला मारून टाकतो म्हणून धमकी देत होता. त्याचवेळी चुलत काकांचा मुलगा सुवालाल नाना पारधी, भास्कर बारकू पारधी हे आले आणि त्यांनी अजय पारधी याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत चाकूने सपासप वार केले.

दरम्यान सुवालाल याच्या डाव्या बरगडीवर, उजव्या खांद्यावर तसेच पाठीवर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वार लागला. तेव्हा सुवालालची सुटका करायला गेलेल्या विजयच्या दंडाला चाकू लागला तर भास्कर पारधी याच्या मांडीला व दंडाला चाकू लागला. हे पाहून आरोपी अजयची आई मुन्नीबाई चाकू हिसकवायला आली असता तिलाही हाताला चाकू लागला. गावातील नागरिकांनी भांडण मिटवून १०८ रुग्णवाहिकेने दवाखान्यात दाखल करण्यात आले.

विजयच्या जबाबवरून आरोपी अजय पारधी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११८(२), ३३३, ३५१(२), ३५२ १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विकास देवरे, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक बागुल करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.