
लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सोमवारपासून ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. आजही याबद्दल चर्चा सुरु असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. लोकसभेत बोलत असताना अमित शाह यांनी जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करत एक वक्तव्य केले.
हल्ला अचूक होता..
“पाकिस्तानने आमच्यावर हल्ला केला. पण त्यांच्या एकाही मिसाईलने काहीही झालं नाही. फक्त जवळून केलेल्या हल्ल्यानंतर एक मंदिर आणि गुरुद्वाराला थोडं नुकसान झालं. एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मोदींनी मिटिंग घेतली आणि लगेचच पाकिस्तानच्या ११ एअर बेसवर हल्ला केला. पाकिस्तानने आमच्या निवासी भागांवर हल्ला केला. पण आपण तसं केलं नाही. आपण फक्त त्यांच्या एअर बेसवरच हल्ला करून त्यांना छिन्नविछिन्न केलं. हल्ला अचूक होता. त्यामुळे पाकिस्तानला शरण येण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओने आपल्या डीजीएमओला फोन केला आणि सीजफायर झालं”, अशी माहिती अमित शाहांनी दिली.
पाकिस्तान व्याप्त काश्मीर फक्त नेहरूंमुळेच..
“१९४८ मध्ये सरदार पटेलांचा नकार असतानाच जवाहरलाल नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम केला. मी इतिहासाचा विद्यार्थ्यी आहे,. जबाबदारीने सांगतो. पाकिस्तान व्याप्त काश्मीरचं अस्तित्व आहे तर ते फक्त नेहरूंमुळेच आहे. नेहरूच त्याला जबाबदार आहे. १९६० मध्ये पटेलांनीही विरोध केला होता. त्यावेळी सिंधू जलावर भौगोलिक आणि जलनीतीवर आपण मजबूत होतो. पण त्यावेळी ८० टक्के भारताचं पाणी पाकिस्तानला दिलं”, असे अमित शाह म्हणाले.
तर ना रहता बास, ना बजती बांसुरी..
“१९७१ च्या युद्धात इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले. हा भारताचा मोठा विजय होता. शतकानुशतके आपण त्याचं स्मरण ठेवू. ९३ हजार युद्ध कैदी होते. १५००० वर्ग किलोमीटर क्षेत्र आपल्या ताब्यात होते. शिमलात करार झाला. पण पाकव्याप्त काश्मीर मागणं विसरलो. तेव्हा पाकव्याप्त काश्मीर मागितला असता तर ना रहता बास, ना बजती बांसुरी. आपण १५००० किलोमीटरची जिंकलेली भूमीही परत केली. १५० पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर कारवाई करायची होती. ती केली नाही”, असेही अमित शाह म्हणाले.

