धुळ्याच्या प्रेमी युगुलाला रेल्वे सुरक्षा बलाने घेतले ताब्यात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अमळनेर; धुळ्याहून पळून सुरतकडे जाणाऱ्या प्रेमी युगुलाला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेऊन धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या १० मिनिटात सुरतकडे जाणारी रेल्वे येण्याआधीच प्रेमीयुगलाचे मनसुबे उधळण्यात आल्याने पालकांनी अमळनेर रेल्वे सुरक्षा बळाच्या कर्मचारीचे आभार मानून कौतुक केले.

अमळनेर रेल्वे स्थानकावर ६ रोजी दुपारी एक तरुण व तरुणी प्रतीक्षा कक्षात संशयित रित्या बसलेले आढळून आले. सुरक्षा बळाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलभूषणसिंग चौहान, कॉन्स्टेबल सुभाष कुमार, महिला कॉन्स्टेबल नीलम बैरागी हे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांना संशय आला. म्हणून त्यांची विचारपूस केली असता मुलीने तिचे नाव चुकीचे सांगून पोलिसांसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खाक्या दाखवून त्यांना पत्ता विचारला असता त्यांनी धुळे येथील सांगितले.

सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धुळे पोलिसांशी संपर्क साधला असता धुळ्याचे पोलिस उपनिरीक्षक बी. एल. दतौजे यांनी आमच्या हद्दीतील मुलगी गायब असल्याचे सांगून नाव मात्र चुकीचे असल्याने त्यांनी खात्रीसाठी व्हीडिओ कॉल करायला सांगितला. योगायोगाने त्या मुलीचे पालक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी बसले होते.

व्हीडिओ कॉलवर पालकांनी आपल्या मुलीला ओळ्खल्याने पोलिसांनी या दोघांना बसवून ठेवण्यास सांगितले. तिकडे मुलाचे पालक देखील त्याला शोधत होते. सुरक्षा बळाच्या पोलिसांनी मुलाच्या भावाला बोलावून घेतले. तर धुळे पोलिसांनी महिला कॉन्स्टेबल माया ढोके यांना मुलीच्या नातेवाईकांसह अमळनेर येथे पाठवले.

मुलीने शाळेच्या दप्तरासह ५ तारखेपासून धुळ्याहून पलायन केले होते. तिच्या पळून जाण्याने आईने धसका घेतल्याने ती आजारी पडली होती. दोघां प्रेमी युगुलाजवळ फक्त २०० रुपये होते. ते सुरत येथे जाण्याच्या तयारीत होते. अवघ्या १० मिनिटात सुरत कडे जाणारी रेल्वे येणार होती. सुरक्षा बळाने सतर्कता ठेवली नसती तर दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले असते. दोघांना आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.